पुणे – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चौकशी केंद्रीय यंत्रणांद्वारे करण्याची मागणी गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली होती. हे वृत्त ताजे असतानाचा अजित पवार यांच्या जवळच्या नातेवाईकाच्या साखर कारखान्यावर ईडीने जप्ती आणली आहे. या प्रकरणात अजित पवार यांचे नाव येताच, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जरंडेश्वर प्रकरणात अजित पवार यांचं नाव आता आलं आहे. याविषयी मी कधीपासून बोलत आहे. मात्र, मी फकीर माणूस. माझं कोण ऐकणार. आता ईडीने लक्ष घातलं आहे म्हटल्यावर सर्व बाहेर पडेल, असं अण्णा हजारे यांनी नमूद केलं.
साखर कारखान्यांच्या अनेक मालकांनी बँकेतून कर्ज घेऊन ते बुडवलं आहे. त्यानंतर साखर कारखान्याची कमी भावात विक्री झाली. यासंदर्भात अण्णा हजारेंनी यापूर्वीच मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्याप्रमाणे मुंबई शाखेच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर ईडीने गुन्हा दाखल करत ही कारवाई केली असल्याचं बोललं जात आहे.
अण्णा हजारे यांनी ईडीच्या कारवाईवर समाधान व्यक्त करताना इतर 49 साखर कारखान्यांची चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे.