मुंबई – शेवटी विजय हा विजयच असतो, त्यामुळे ज्यांचा पराजय झाला त्यांनी काहीही कारणं सांगितली तरी त्याचा फारसा उपयोग नाही. मात्र उत्तर प्रदेशमध्ये जर सर्व विरोधकांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली असती, तर आजचे हे चित्र कदाचित दिसले नसते, असे मत काल घोषित झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालाबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपच्या हातातूनही काही राज्यं गेली आहेत. त्यामुळे एखादं मोठं राज्य जिंकलं म्हणून महाराष्ट्रातलं सरकार देखील पडेल, हे काही शक्य नाही. महाराष्ट्राची मानसिकता वेगळी आहे. सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस ही आघाडी जोपर्यंत भक्कम आहे तोपर्यंत या सरकारला कोणताही धोका नाही. तसेच मुंबई महापालिका शिवसेनेच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्यारीतीने काम करत आहे. त्यामुळे भाजपकडून फक्त वातावरण निर्मिती करण्याचा प्रकार होत आहे, असे त्यांनी सांगितले.
सध्या केंद्रीय तपास यंत्रणाकडून सुरू असलेल्या धाड सत्रावर ते म्हणाले की, भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करायला कोणाचाही विरोध नाही परंतु असे भ्रष्टाचारी फक्त भाजप सोडून इतर पक्षातच आहेत का? त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांनी जरा त्यांच्याकडेही लक्ष द्यावं, असा टोला मंत्री जयंत पाटील यांनी लगावला.