पुणे :- मा. शरदचंद्रजी पवार आणि मा. अण्णासाहेब पठारे यांच्या वाढदिवसानिमित्त खराडी जिमखाना व आर्या स्पोर्टस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आर्या स्पोर्टस टी-२० क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत शुभम तैस्वाल ९९ धावा व २-३१) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर शांताराम बापू कटके संघाने रॉयल पुरंदर संघाचा ४२ धावांनी पराभव करून विजेतेपद संपादन केले.
खराडी जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत शांताराम बापू कटके संघाने प्रथम फलंदाजी करताना २०षटकात ३बाद २३७धावा केल्या. यात शुभम तैस्वालने ४५चेंडूत १२ चौकार व ५ षटकाराच्या मदतीने ९९ धावा चोपल्या. त्याला ऋतुराज वीरकरने(६३)चांगली साथ दिली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी १११ धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली.
त्यांनतर आदिल अन्सारीने नाबाद ४५ धावा, रजनीकांत पडवळने नाबाद १४ धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. याच्या उत्तरात रॉयल पुरंदर संघाला २० षटकात ९ बाद १९५धावाच करता आल्या. यात वरुण चौधरी नाबाद ५२, अभिजीत लोखंडे नाबाद ३३, अभिमन्यू जाधव २३ यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. शांताराम बापू कटके संघाकडून ओम माळी(४-४२), शुभम तैस्वाल(२-३१), हॅरी सावंत(२-३२) यांनी सुरेख गोलंदाजी केली. सामनावीर शुभम तैस्वाल ठरला. स्पर्धेतील विजेत्या शांताराम बापू कटके संघाला करंडक व १ लाख रुपये, तर उपविजेत्या रॉयल पुरंदर संघाला करंडक व ६१,०००रुपये अशी पारितोषिके देण्यात आली.
Test Cricket : गिलचे करिअर उद्ध्वस्त करू शकतो रोहितचा ‘हा’ निर्णय; असे आहेत मागील 6 डावांचे आकडे..
निकाल (अंतिम फेरी) :
शांताराम बापू कटके : २० षटकात ३ बाद २३७ (शुभम तैस्वाल ९९, ऋतुराज वीरकर ६३, आदिल अन्सारी नाबाद ४५, रजनीकांत पडवळ नाबाद १४, वरुण चौधरी १-२६) वि.वि.रॉयल पुरंदर: २० षटकात ९बाद १९५ (वरुण चौधरी नाबाद ५२, अभिजीत लोखंडे नाबाद ३३, अभिमन्यू जाधव २३; ओम माळी ४-४२, शुभम तैस्वाल २-३१, हॅरी सावंत २-३२); सामनावीर – शुभम तैस्वाल.