नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी जाहीर केले की ते विपश्यना ध्यानासाठी जात आहेत आणि त्यांनी लोकांनांही किमान एकदा विपश्यना ध्यानासाठी जाण्याचा सल्ला दिला आहे. विपश्यना हे एक प्राचीन भारतीय ध्यान तंत्र आहे ज्यामध्ये साधकाचे मानसिक आरोग्य तंदुरूस्त राखले जाते.
केजरीवाल हे त्यांच्या आयुष्यात नियमितपणे विपश्यना ध्यान करीत आले आहेत. त्यांनी धरमकोट,इगतपुरी आणि बंगळुरू येथे ही ध्यानसाधना केली आहे. पण यावेळी ते यासाठी कोठे जाणार आहेत हे मात्र नमूद करण्यात आलेले नाही.
आज मी विपश्यना ध्यानासाठी जात आहे, मी वर्षातून एकदा या ध्यानशिबीराला जाण्याचा प्रयत्न करतो. मी 1 जानेवारीला परत येईन.प्राचीन काळी भगवान बुद्धांनी हे ज्ञान शिकवले होते. याचा खूप शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक फायदा होतो, आपणही या ध्यान प्रक्रियेचा लाभ घ्या असे आवाहन केजरीवालांनी आपल्या ट्विटर संदेशात केले आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर आणि 2013 मधील दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर केजरीवालांनी विपश्यना सरावासाठी ब्रेक घेतला होता.