बारामती (प्रतिनिधी) – बारामती एमआयडीसीमधील अनेक भागात विशेषता जी विभागात पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही याबाबत उद्योजकांच्या अनेक दिवसांपासून तक्रारी आहेत. बारामतीमध्ये कृत्रिम पाणी टंचाईमुळे उद्योजक मेटाकुटीस आले आहेत. एमआयडीसीला सुरळीत पाणीपुरवठा सुरू करा अन्यथा आंदोलनाचा छेडले जाईल, असा इशारा बारामती इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशने दिला आहे. एमआयडीसी प्रशासनाला याबाबत निवेदन देण्यात आले आहे.
बारामती इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, उपाध्यक्ष शरद सूर्यवंशी, सचिव अनंत अवचट, खजिनदार राधेश्याम सोनार, सदस्य मनोहर गावडे, महादेव गायकवाड, संभाजी माने, शेख वकील, चारूशिला धुमाळ, हरिष कुंभरकर, धनंजय धुमाळ आदींनी एमआयडीसीचे बारामती विभागाचे कार्यकारी अभियंता संजय जोशी यांना निवेदन दिले.
उजनी जलाशयात पुरेसा पाणीसाठा असताना देखील केवळ हलगर्जीपणा मुळे एमआयडीसी उद्योगांना पाणी पुरवू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. उद्योजक एमआयडीसीच्या पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार संपर्क साधून तक्रार केली आहे. परंतु संबंधित अधिकारी प्रतिसाद देत नसलेचा अनेकांचा अनुभव असल्याचे उद्योजकांनी निवेदनात म्हटले आहे.
लॉकडॉनमुळे उद्योग प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत. एमआयडीसीच्या हलगर्जीपणामुळे मोठी किंमत मोजून पाणी टॅंकरद्वारे विकत घ्यावे लागत आहे. असे निवेदनात नमूद केले आहे. तसेच एमआयडीसीकडून पाणीपुरवठा व्यवस्थित करण्याची कार्यवाही त्वरित झाली नाही तर पदाधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणार असलेची माहिती अध्यक्ष धनंजय जामदार यांनी यावेळी दिली.
उजनी जलाशयामधील एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारे जॅकवेलचे खोल नदीपात्रात नुकतेच स्थलांतर करण्यात असून त्याची चाचणी सुरू आहे. नवीन जॅकवेल व्यवस्थित कार्यान्वीत होताच बारामती एमआयडीसीमधील विस्कळीत पाणीपुरवठा वैयक्तिक लक्ष घालून तातडीने नियमित करण्यात येईल.
– संजय जोशी, कार्यकारी अभियंता, बारामती एमआयडीसी विभाग