विक्रम कुंभार
हेळगाव – साधारण सात जूनच्या आसपास राज्यात मान्सूनचे आगमन होते, हा इतिहास आहे. परंतु, चालू वर्षी निम्मा जून महिना उलटला तरी मान्सून पूर्व निर्माण होणारे हवामानच तयार होत नसल्याने बळीराजाला आणखी काही दिवस मान्सूनची वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे बळीराजाची चिंता आणखी वाढली असून “येरे…येरे… पावसा’ म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
हेळगावसह पाडळी, गायकवाडवाडी, गोसावेवाडी, बानुगडेवाडी या भागात अजूनही सुमारे 40 टक्के क्षेत्र हे मान्सूनच्या हंगामी पावसावरच अवलंबून आहे. या भागातील बळीराजा मे महिन्याच्या अखेरीस आपल्या सर्व जिरायती क्षेत्राच्या जमिनीच्या मशागती पूर्ण करून पावसाची वाट पाहत असतो. साधारण पावसाला सुरुवात झाली, की हायब्रीड, कडधान्य, भुईमूग, सोयाबीन, आरगड अशा पिकांची पेरणी केली जाते. परंतु, यापूर्वी मान्सूनची सुरुवात होणे अपेक्षित असते. शिवाय यावर्षी दरवर्षीपेक्षा प्रचंड प्रमाणात उन्हाळ्याचा त्रास जाणवला.त्यामुळे असे वाटू लागले की मान्सूनपूर्व पाऊस मुबलक पडेल आणि पेरणीपूर्वची तयारी करता येईल. पण मान्सूनपूर्वक पावसाने या भागात दडी मारल्याने त्यावरही पाणी फेरलं. उरलीसुरली अपेक्षा मान्सूनच्या पावसाची. पण तोही वेळेवर पडण्याची शक्यता धूसर झाल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढली आहे.
हेळगाव, पाडळी, गायकवाडवाडी, गोसावेवाडी, बानुगडेवाडी भागात जिरायती क्षेत्राबरोबर बागायती क्षेत्रही असले, तरी विहीर, बोअरवेळ किंवा कॅनॉल हीच पाण्याची साधने आहेत. पावसाने आणखी काही दिवस ओढ दिल्यास त्यावरही विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे सध्यातरी मान्सून सुरू होण्याची गरज असल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. वैष्णवांचा सोहळा सध्या सुरू झाला असून सर्वच पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. पण पालख्या पोहोचण्याच्या आधीच “पांडुरंगाने बळीराजा हाकेला धावावं’ अशीच प्रार्थना शेतकरी वर्ग करत आहे.
उसाची लागणही थांबली…
साधारण जून महिन्यात आडसाली उसाची लागण या परिसरात मोठ्या प्रमाणावर केली जाते. ज्यां शेतकऱ्याचे स्वतःचे पाणी आहे. त्यांनी उसाची लागण केली असून ज्यांची शेती कॅनॉलवर अवलंबून आहे. त्यांनी मात्र पाण्याच्या उपलब्धतेचा विचार करत लागण थांबवल्याचे चित्र या परिसरात दिसून येत आहे.