कोल्हापूर – कोल्हापूरच्या महालक्ष्मी (अंबाबाई मंदिर) आणि ज्योतिबा मंदिरातील जुने सुरक्षारक्षक काढून त्यांच्या जागी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे रक्षक नेमण्यास मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास नकार दिला आहे. मंदिर ट्रस्टला जुने सुरक्षारक्षक काढून नवीन नेमणूक करण्यास दिलेली अंतरिम स्थगिती पुढील सुनावणीपर्यंत हायकोर्टाने कायम ठेवली आहे.
महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक आणि जनरल कामगार युनियनचे रक्षक या दोन मंदिरांच्या सेवेत सन 2016 पासून तैनात आहेत. महालक्ष्मी मंदिरात 49 तर ज्योतिबा मंदिरात 10 सुरक्षारक्षक आहेत. या सुरक्षारक्षकांना काढून आता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील शस्त्रधारी रक्षकांची नेमणूक मंदिर ट्रस्टला करायची आहे.
तसे पत्र त्यांनी महामंडळाकडे दिलेले आहे. याविरोधात या सुरक्षारक्षकांनी अविनाश बेळगे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मंदिराला धोका आहे. आता जे सुरक्षारक्षक आहेत ते शस्त्रधारी नाहीत. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे सुरक्षारक्षक शस्त्रधारी आहेत.
त्यामुळे जुने सुरक्षारक्षक काढून महामंडळाच्या शस्त्रधारी रक्षकांची नेमणूक करण्यात येत आहे, असा युक्तिवाद ट्रस्टच्या वतीने केला गेला आहे. मात्र याला याचिकाकर्त्यांनी विरोध केला आहे. आता जे मंदिराची सुरक्षा बघतात त्यांची नेमणूक भाविकांना रांगेतून सोडण्यासाठी आणि त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी करण्यात आली आहे.
परिणामी त्यांना सेवेतून काढता येणार नाही, असा दावा याचिकेतून केला गेला आहे. याची नोंद करून घेत हायकोर्टाने ट्रस्टला जुने सुरक्षारक्षक काढून नवीन नेमणूक करण्यास अंतरिम मनाई केली आहे.
मात्र जुने सुरक्षारक्षक न काढता तुम्ही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या शस्त्रधारी रक्षकांची नेमणूक करू शकता, असेही हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. मात्र हे अंतरिम आदेश रद्द करावेत, अशी मागणी ट्रस्टने हायकोर्टाकडे केली आहे.