खटाव – खटाव, ता. खटाव येथील लोकनियुक्त सरपंच नंदकुमार वायदंडे यांनी सर्व सहकारी महिला ग्रामपंचायत सदस्या भगिनींसमवेत भाऊबीज साजरी करून एक वेगळा आदर्श घालून दिला. या उपक्रमामुळे परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.
परंपरेनुसार भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला आरती ओवाळून त्याची पूजा करीत असते. भावाला प्रेमाचा टिळा लावते तो टिळा बहिणीच्या निस्वार्थी प्रेमभावना व्यक्त करत असतो. भावाची पूजा म्हणजे यमराजाच्या पाशातून भावाची सुटका व्हावी व तो चिरंजीव राहावा. हा या मागचा उद्देश असतो. भाऊ आपल्या यथाशक्तीप्रमाणे ओवाळणी म्हणून बहिणीला पैसे, कापड, दागिना अथवा भेटवस्तू ओवाळणी म्हणून टाकतो. भाऊ-बहिण्याच्या अतूट नात्याची सुंदर परंपरा आपल्या संस्कृतीत आहे.
याच परंपरेला व संस्कृतीला जागून सरपंच नंदकुमार वायदंडे यांनी आपल्या सहकारी भगिनींना व येथील ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या अपर्णा गाढवे, राजश्री बोर्गे, नसीमबानू काझी, मनिषा कुंभार, रेश्मा लावंड, शायरा मुल्ला, कांचन शिंदे,माधवी सकटे, सुरेखा पाटोळे आदी भगिनींना भाऊबीजेच्या सणाचं औचित्य साधून साडी चोळी व मिठाई भाऊबीज ओवाळणी म्हणून भेट एक आदर्श नव्या पिढीसमोर ठेवला. याप्रसंगी उपसरपंच राहुल जमदाडे, माजी उपसरपंच दीपक घाडगे, अमर देशमुख, महेश घाडगे, सतीश सावंत आदी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.