नवी दिल्ली – करोनाविरोधातील लढाईत आमच्या सहकाऱ्यांनी गौरवास्पद कामगिरी नोंदवली आहे. आम्ही यापुढेही राष्ट्र आणि मानवतेच्या सेवेसाठी कटिबद्ध आहोत, अशा शब्दात एअर इंडियाचे अध्यक्ष राजीव बन्सल यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचा गौरव केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या सूचनेनुसार अनेक संकटावर मात करीत एअर इंडियाने जर्मनी, फ्रान्स, कॅनडा येथील नागरिकांनाही त्यांच्या मायदेशी पाठविण्यासाठी सेवा दिली. तसेच विदेशात अडकलेल्या भारतीयांना सुखरूप परत आणले. एअर इंडियाची वैद्यकीय पथके 24 तास आपत्तकालीन सेवा बजावत आहे.
पत्रात बन्सल यांनी म्हटले आहे की, एअर इंडियाने दोन आठवडयांमध्ये सुमारे 100 हून अधिक उड्डाणे केली. चीनमधील वुहानमध्ये जेव्हा कोरोनाने थैमान घातले होते. तेव्हा एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावत कर्तव्य बजावले. विदेशात अडकलेल्या हजारो भारतीयांना मायदेशी आणले आहे. त्याचबरोबर वैद्यकीय साहित्य पोहचविण्यात अग्रस्थानी राहिले.
अत्यावश्यक वस्तुंच्या सेवेचा पुरवठा केल्यानंतर पाकिस्तानच्या हवाई नियंत्रण विभागानेही एअर इंडियाचे विशेष आभार मानले. आमच्या प्रत्येक सहकाऱ्यावर आम्हाला गर्व आहे. त्यांनी प्राण धोक्यात घालून कोरोना विषाणूविरोधात लढाई लढली. त्यांच्या कामगिरीमुळे करोनातून मुक्त होण्याचा विश्वास वाढला आहे. सद्यस्थितीमधील परिस्थिती आमच्यासमोर मोठे आव्हान आहे. कोरोनाच्या साथीचा फैलाव झाल्यानंतर एअर इंडिया देशवासियांना मायदेशी आणण्यासाठी सज्ज झाली, असे बन्सल म्हणाले.
आमच्यासाठी आमच्या कर्मचाऱ्यांचे आरोग्यही तेवढेच महत्त्वपूर्ण आहे. एअर इंडियाने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली. त्यामुळे केवळ एकाच कर्मचाऱ्याला करोनाची बाधा झाली. उपचारानंतर तो पूर्ण बरा झाला आहे. आम्ही यापुढेही राष्ट्र आणि मानवतेच्या सेवेसाठी कटिबद्ध आहोत, अशी ग्वाहीही बन्सल यांनी पत्रातून दिली आहे.