पुणे : शासकीय पदभरती प्रक्रियेतील सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्याच्या मागणीसाठी स्पर्धा परीक्षा उमेदवादानी सोमवारी एक दिवस लाक्षणिक उपोषण केले. एमपीएससी स्टुडंट्स राइट्स आणि एमपीएससी समन्वय समितीतर्फे लकडी पुलाजवळील टिळक चौकातील केळकर पुतळ्याजवळ हे उपोषण करण्यात आले.
महापरीक्षा संकेतस्थळ बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. मात्र, त्यानंतर विविध विभागांतील पदांची भरती विभागीय स्तरावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी यंत्रणा निर्माण करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
स्पर्धा परीक्षा उमेदवारांचा या भरती प्रक्रियेला विरोध आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवावी असे उमेदवारांचे म्हणणे आहे. त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.
त्याशिवाय १९९८ चा शासन निर्णय रद्द करून पदवीधारकांना जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम आणि जलसंधारण विभागातील कनिष्ठ अभियंता पदासाठी पात्र करण्याचीही उमेदवारांची मागणी आहे.