आपल्या आयुष्यात मनःशांती ही सर्वोच्च स्थानी आहे. त्यानंतर पैसा, यश, कीर्ती वगैरे भौतिक सुखाच्या गोष्टी येतात. मग हीच मनःशांती मिळविण्यासाठी सत्याची कास का धरावी याविषयी थोडेसे…
आपण आपल्या आयुष्यात बऱ्याच प्रसंगांना सामोरे जात असतो. त्यातील काही प्रसंग आपली कसोटी पाहणारे असतात. अशाच प्रसंगी आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवावी लागते. त्यामुळेच आपली प्रतिमा व चारित्र्य झळाळून निघते.
आपण आपल्या कामाप्रती समर्पित आणि प्रामाणिक असायलाच हवे. जर आपण आपल्या कामाला न्याय देऊ शकत नसू तर ते काम करण्याचा आपल्याला नैतिक अधिकार नाही. बरेच शिक्षक सरकारी अथवा खासगी संस्थेत नोकरी करीत असतात, पण ते वर्गात केवळ जुजबी शिकवितात, पण तोच विषय त्यांच्या घरी शिकवणीमध्ये मात्र अधिक चांगल्या प्रकारे शिकवत असतात. शिकवणीमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी यावेत व जास्तीत जास्त आर्थिक प्राप्ती व्हावी म्हणून प्रयत्नशील असतात. वास्तविक पाहता जो शिक्षक शाळेत शिकवत असतो त्याची योग्यता पाहूनच निवड केलेली असते. त्याला त्यासाठी पगार मिळत असतो. त्या शाळेमुळे त्या शिक्षकाची ओळख तयार झालेली असते.
आपण जे काम करीत आहोत ते इमाने इतबारे करायलाच हवे. जर एखाद्या शिक्षकाला मिळत असलेले वेतन मान्य नसेल, कमी वाटत असेल तर दुसरी जास्त पगाराची नोकरी शोधावी, पण एकीकडे कामाचे वेतनही घ्यावयाचे आणि दुसरीकडे काम करण्यात मात्र कुचराई करावयाची हे योग्य नाही. एक तर घरीच शिकवण्या घ्या किंवा इमाने इतबारे नोकरी तरी करा. आपले काम करताना अग्रस्थानी कामाप्रती प्रमाणिक असणे हेच हवे, त्यानंतर इतर घटकांचा क्रम लावावा. आपल्याला शाश्वत प्रगती जर करावयाची असेल तर सत्याचाच मार्ग अवलंबावयास हवा. त्याला पर्याय नाही. एकेकाळी आलिशान गाड्यांमधून फिरणारे, याशिवाय राजवाड्यासारख्या घरांतून राहणारे आणि देशातील आघाडीचे व्यावसायिक म्हणून मिरविणारे बरेच लोक, अनेक लोकांची रक्कम हडप करून बसले, पण ते एके दिवशी गजाआड गेलेलेही मी पाहिले आहेत.
एक बातमी वाचनात आली, “10-20 रुपयाची किरकोळ रकम उधार घेतलेली पण परत दिली नाही म्हणून खून केला.’ येथे वरवर पाहता आपल्याला वाटते की केवळ 10-20 रुपयांसाठी कोणाचा खून करणे हा काय वेडेपणा आहे? याच घटनेची दुसरी बाजू अशी असते की ज्याने पैसे उधार दिले त्याची फसवणूक झालेली असते आणि तेथेच त्याच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचलेली असते, त्याची फसवणूक झाल्याचे जिव्हारी लागलेले असते. येथे किती रकमेची फसवणूक झाली याला काही महत्त्वच उरत नाही. तर आपली फसवणूक झाली याचा मनस्वी राग निर्माण झालेला असतो आणि फसविणारी व्यक्ती समोर असते. मग संयम सुटतो आणि हातून काही विपरीत घडून जाते.
राजकीय नेते व वकील प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणात न्यायालयाने 31 ऑगस्ट 2020 रोजी केवळ 1 रुपया दंडाची शिक्षा सुनावली होती. जर दंड नाही भरला तर 3 महिने तुरुंगवास, पण प्रशांत भूषण यांनी 1 रुपया भरला. यावरून लक्षात घ्यावे की शिक्षा झाली याला महत्त्व आहे दंडाची रक्कम महत्त्वाची नाही. एखाद्या गुन्ह्यासाठी न्यायालय “न्यायालय उठेपर्यंत शिक्षा’ अशी शिक्षा ठोठावते. त्यावेळी किती कठोर शिक्षा केली यापेक्षा शिक्षा केली यालाच जास्त महत्त्व असते. दंड झाला याला महत्त्व असते रक्कम महत्त्वाची नसते. यावरून शिक्षा मनाला केली जाते, शरीराला नाही हे लक्षात घ्यावे. अशा शिक्षेनेही मन घायाळ होऊन जाते.
जेव्हा आपण कोणाकडून थोडेफार पैसे घेतो आणि परत देतच नाही, अशा वेळी आपणच आपले प्रश्न वाढवून ठेवतो. ज्याच्याकडून पैसे घेतलेले असतात तो पैसे वसूल करण्यासाठी आपल्या मागे हात धुऊन लागतो. मग त्याला गुंगारा देणे हे एक काम होऊन बसते. याचा परिणाम आपल्या कामावर होतो. आपल्या कामावर आपण लक्ष केंद्रित करू शकत नाही. तो माणूस आपल्याविषयी चार लोकांना सांगतो. त्यामुळे आपली प्रतिमा मलिन होते. आणखी गंभीर परिणाम म्हणजे आपल्याला मदत करणारे हात आपणच “कलम’ करून टाकलेले असतात. एक फसवणुकीचे काम करण्यासाठी बरीच चुकीची कामे करावी लागतात. त्या दुष्टचक्रात आपण अडकून पडतो.
अशा चक्रव्यूहात आपण अडकतो की जिथून बाहेर पडण्याचा मार्गच आपल्याला सापडत नाही, शेवटी सगळेच संपलेले असते. फसवणूक केवळ आर्थिक बाबतीतच असते असे नाही तर मुलगा अथवा मुलीचे व्यंग अथवा दोष लपवून लग्न केले जाते, अन्नपदार्थांत भेसळ केली जाते, लाच स्वीकारली जाते, भ्रष्टाचार केला जातो, यावरून फसवणूक ही इतरही अनेक प्रकारे होत असते हे लक्षात घ्यावे. आपण आपले आयुष्य सुखाने जगावयाचे असल्यास, क्षणिक फायद्यासाठी आपला संयम कधीही ढळू द्यावयाचा नाही, मोहात कधी पडायचे नाही. सत्याच्या मार्गाने जाताना आपल्यावर कधी दबावसुद्धा आणला जाईल, कितीही त्रास झाला तरी विचलित व्हावयाचे नाही.
सत्यमेव जयते नानफतं सत्येन पन्था विततो देवयानः।
येनाक्रमक्त्यफषयो ह्याप्तकामा यत्र तत् सत्यस्य परमं निधानम् ।।
(स्थूलार्थ : सत्याचाच विजय होतो, असत्याचा नाही. दैवी मार्ग सत्याने सुकर होतो. हाच तो मार्ग आहे की ज्याद्वारे आप्तकाम (ज्याच्या सर्व मनोकामना पूर्ण झाल्या आहेत) मनुष्य जीवनातील सर्वोत्तम लक्ष प्राप्त करतो)
आपण कोणाला कितीही फसविण्याचा प्रयत्न केला तरी प्रत्येक वेळेस आपण त्यात यशस्वी होऊ असे नाही; पण ज्यावेळेस “सत्य’ इतरांना कळेल त्यावेळेस आपण नामोहरम झालेलो असू आणि हे आपल्याला सगळ्यात शेवटी समजते. त्यावेळी बराच उशीर झालेला असतो. सत्य कदाचित काही काळ कमजोर पडेल; पण कधीही पराभूत होत नाही. शेवटी “झुट के कोई पॉंव नही होते।’ हेच खरे. आपण सत्याची कास कधीही सोडायची नाही.
आपण आपल्या मन मंदिराच्या गाभाऱ्यात बसून केवळ “सत्यमेव जयते’ या विचाराचेच पुष्प जर आपल्या मनोदेवतेला अर्पण केले तर आपल्या आयुष्यात भले पैसा, प्रसिद्धी, यश कमी मिळो पण जे मिळेल ते शाश्वत असेल. आपण शांत समाधानी आयुष्य जगू यात शंकाच नाही.
अनिकेत भालेराव