भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा याला मुलाखतीसाठी धमकावल्या प्रकरणी बीसीसीआयने वरिष्ठ क्रीडा पत्रकार बोरिया मुजुमदार यांच्यावर दोन वर्षांची बंदी लावली. ही एक घटना होती व बीसीसीआयची कारवाई त्यावरची प्रतिक्रिया. मात्र, यावरून एक गोष्ट समोर आली की, खेळाडूंना त्यांच्या मुलाखतीसाठी किंवा अन्य कोणत्याही गोष्टींसाठी आता माध्यमे तसेच त्यात काम करणारे पत्रकार चक्क धमकी देताना दिसतात. अशा प्रवृत्तींचे बोरिया बिस्तर वेळेवरच गुंडाळले गेले पाहिजे.
साहाने केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत बीसीसीआयने त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन केली होती. सुरुवातीला बोरिया मुजुमदार यांचे नाव घेण्याचे टाळत असलेल्या साहाने चौकशी समितीसमोर नाव उघड केले, सर्व पुरावे दिले व अखेर बीसीसीआयने अत्यंक कठोर कारवाई करत बोरिया यांच्यावर दोन वर्षांची बंदी लावली. इतकेच नव्हे तर बीसीसीआयशी संलग्न असलेल्या सर्व राज्यांच्या क्रिकेट संघटनांनाही बोरियाबाबत दोन वर्षांची बंदी ठेवण्याचेही निर्देश दिले. आता पुढील दोन वर्षे बोरियांना कोणत्याही सामन्यांना उपस्थित राहता येणार नाही, त्यांना कोणत्याही खेळाडूशी संपर्क साधता येणार नाही.
बीसीसीआयच्या मान्यतेखाली क्रिकेटशी संबंधित कोणत्याही गोष्टींत सहभागीही होता येणार नाही. पत्रकारिता क्षेत्रच असे आहे की जिथे काही वर्षे व्यतीत केल्यावर काही पत्रकार स्वतःला गॉडफादर सामजायला लागतात. साहा काही पहिलाच खेळाडू नसेल; पण पुढे येत तक्रार करण्याची हिंमत त्याने दाखवली. आता बीसीसीआयने आपल्या घटनेतही त्यानुसार बदल करत अशा प्रवृत्तींना वेळेवरच रोखायला हवे. ही कीड वाढता कामा नये. जी कोणती माध्यमे स्वतःला गॉडफादर समजतात त्यांचे बोरिया बिस्तर अत्यंत कठोरपणे गुंडाळलेच गेले पाहिजे, तरच अशा प्रवृत्तींना वाढीसाठी खतपाणी मिळणार नाही.
पश्चिम बंगालचे प्रतिनिधित्व करत असेलल्या साहा याने गेल्या 19 फेब्रुवारीला ट्वीट करत एका क्रीडा पत्रकाराने केलेल्या मेसेजचा स्क्रिनशॉट पोस्ट केला होता. या पत्रकाराकडून मला मुलाखतीसाठी धमकावले गेल्याचेही उघड केले होते. पत्रकारिता आता या पातळीवरही पोहचली आहे, असेही त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. साहाच्या या ट्विटनंतर खळबळ उडाली व बीसीसीआयने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी समिती स्थापन करत संपूर्ण तपास करण्याचे आदेश दिले. या चौकशीत बोरिया मजुमदार दोषी आढळले व त्यानंतर बीसीसीआयने त्यांच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. या बंदीनुसार सर्व राज्य क्रिकेट संघटनांना मजुमदार यांना स्टेडियममध्ये प्रवेश करण्यास बंदी घालावी असे सांगण्यात आले आहे. तसेच देशातील सामन्यांमध्ये मजुमदार यांना माध्यम प्रतिनिधी म्हणूनही मान्यता दिली जाणार नाही. मजुमदार यांना काळ्या यादीत टाकत त्यांच्यावर तसेच ते कार्यरत असलेल्या माध्यमावरही हा
बहिष्कार असेल.
आयसीसीकडेही विनंती
मुजुमदार यांच्यावर ही कारवाई केल्यावर बीसीसीआयने आयसीसीकडेही अशीच विनंती केली आहे. परदेशात होत असलेल्या सामन्यांनाही बोरिया यांना उपस्थित राहता येऊ नये, तसेच त्यांचे नाव आयसीसीनेही काळ्या यादीत टाकावे व जगभरात कुठेही होत असलेल्या सामन्यांना त्यांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाऊ नये, असेही बीसीसीआयने आपल्या विनंती पत्रात म्हटले आहे. खरेतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली हे माध्यमांच्या प्रतिनिधींमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांचे जवळपास प्रत्येक क्रीडा पत्रकारांशी सलोख्याचे तसेच मैत्रीपूर्ण संबंध आहेत. गांगुली एक खेळाडू म्हणून खेळत होते तेव्हाही आणि आता ते बीसीसीआयचे अध्यक्ष असतानाही पत्रकारांशी मनमोकळेपणाने संवाद साधण्याची त्यांची ख्यातीही आहे.
अर्थात ते अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी महाराष्ट्राच्या पत्रकारांबाबत काहीवेळा दुर्लक्ष केल्याची उदाहरणे आहेत; पण त्यामागेही काही वेगळी कारणे आहेत. पण साहा याच्या बाबतीत त्यांनी व बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी घेतलेली भूमिका अत्यंत स्वागतार्ह आहे. बोरिया सारख्या प्रवृत्तींना वेळेवरच ठेचले गेले पाहिजे अन्यथा क्रीडा पत्रकारितेला पीत पत्रकारितेचे स्वरूप यायला वेळ लागणार नाही. खेळाडूंशी मैत्री करायची, त्याला सातत्याने प्रसिद्धीच्या झोतात आणण्याचे आमिष दाखवायचे, त्यासाठी देणगी किंवा मोठी गिफ्ट घ्यायची किंवा मागायची, तसेच मुलाखतीसाठी बोरिया यांनी जे केले तसेच धमकवायचे हे असले उद्योग अनेकदा भूतकाळातही घडलेले आहेत. मात्र, आता बीसीसीआयने कोणताही शाब्दिक निषेध न करता कारवाई केली.
फौजदारी गुन्हा ठरावा
जसे खंडणीसाठी एखादा गुन्हेगार कोणाला तरी धमकावतो, तेच क्रीडाक्षेत्रातील हा प्रकार आहे. त्यामुळे धमकी दिल्यामुळे गुन्हेगारावर फौजदारी गुन्हा नोंदवला जातो किंवा त्याला अटक केली जाते व शिक्षाही होते. इतक्या टोकाची कारवाई या प्रकरणातही व्हावी. कोवळ बोरियाच नव्हे तर त्यांची बाजू घेणारे किंवा त्यांच्यासारखेच कृत्य करणारे पत्रकार स्वतःला रिमोट कंट्रोल समजणार नाहीत. पूर्वी 1999-2000 साली क्रिकेटमध्ये फिक्सिंगचा गदारोळ झाला होता. त्यात काही खेळाडूही अडकले होते व बीसीसीआयने त्यांच्यावर कारवाईही केली होती.
मात्र, काही वर्षांनी त्यांच्यावरच कारवाई मागे घेतली गेली व तेच लोक आज तोंड वर करून समाजात वावरताना दिसतात. हेच फिक्सर विविध वाहिन्यांवर समीक्षा करताना दिसतात, समालोचन करताना दिसतात. यातील काही व्यक्ती तर ज्या राज्यांनी बंदी घातली होती, त्याच राज्य संघटनांवर पद भूषवतानाही दिसत आहेत. एखाद्या संघाचे प्रशिक्षक, स्वतःची आकादमी वगैरेही चालवतात. खरेतर त्यांना क्रिकेटशी कोणताही संबंध व संपर्क ठेवताच येणार नाही, अशी कारवाई केली जायला हवी होती. मात्र, ठीक आहे त्यावेळी झाले नाही आता साहा याच्या प्रकरणावरून किमान अशा धमकीखोर पत्रकारांना तरी रोखा म्हणजे या प्रवृत्ती वाढीला लागणार नाहीत व पत्रकार क्षेत्र बदनाम होणार नाही.
साहाची कृती समर्थनीयच
जेव्हा हे धमकी प्रकरण घडले व साहाने त्याबाबतचे ट्विट केले तेव्हा अनेकांनी त्याला गांगुलीशी तसेच बीसीसीआयशी संपर्क साधण्याचे तसेच त्या पत्रकाराचे नाव उघड करण्याचे सल्ले दिले होते. मात्र, त्यावेळी मला कोणाची कारकीर्द संपुष्टात आणायची नाही, असे साहाने सांगितले होते. तेव्हा जरी साहाच्या वक्तव्यावर टीका झाली होती, तरीही त्याचे मत समर्थनीयच होते. इतकी टोकाची भूमिका घ्यावी का, या संभ्रमावस्थेत तो होता व ते समजण्यासारखेही होते.
त्यावेळी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही, असे जाहिरपणे सांगितले होते. माजी फिरकी गोलंदाज व आयपीएलच्या गव्हर्निंग काउंसिलचे सदस्य प्रज्ञान ओझा यांनी साहाला फोन केला होता. तसेच या पत्रकारावर कोणतीही कारवाई करायची असेल तर बीसीसीआय तुझ्या पाठीशी आहे, असेही ओझा यांनी सांगितले होते. मात्र, चौकशी समिती स्थापन केल्याने संपूर्ण तपास होण्यापूर्वी असे काही करण्याची गरज नसल्याचे साहाने ओझा यांना सांगितले होते.
मूळ घटना काय होती?
साहा याच्यासह अन्य काही खेळाडूंना स्पष्ट संकेत मिळाले होते की येत्या काळात भारतीय संघात स्थान देण्याच्या विचारात निवड समिती नाही. पुढील पाच ते दहा वर्षांचा विचार करता नवोदितांना जास्तीत जास्त संधी देत आगामी काळात होत असलेल्या स्पर्धांसाठी संधी देण्याचा विचार निवड समिती करत आहे, असे सांगितले गेले होते. त्यावेळी साहाने नाराजी व्यक्त करत बीसीसीआय व निवड समितीवर ताशेरे ओढले होते. एका सामन्यात साहा याने अर्धशतकी खेळी केल्यावर तुझे संघातील स्थान कायम राहील, असा संदेश बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनीच केल्याचे साहा याने सांगितले होते.
मात्र, जेव्हा पुढील मालिकांसाठी संघ निवड झाली तेव्हा त्यात साहा याचे नाव नव्हते आणी तेव्हापासून साहाने थेट माध्यमांशी संपर्क करत आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. त्यानंतर बोरिया यांनी याबाबत मुलाखत द्यावी असे साहाला सांगितले होते. मात्र, या गोष्टीसाठी साहा तयार नव्हता. मग बोरिया यांनी त्याला याच विषयावर बोलण्यासाठी दबाव टाकत मुलाखतीसाठी धमकावले होते.
आयपीएल स्पर्धेत सरस कामगिरी
भारतीय संघात जरी स्थान मिळवता आले नाही तरीही साहा याने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत नवा संघ असलेल्या गुजरात टायटन्सकडून अत्यंत सरस कामगिरी केली आहे. वयाच्या 38 व्या वर्षीही साहा याने कामगिरीत चमक दाखवली आहे. यंदाच्या मोसमात त्याने 5 सामने खेळताना 154 धावा केल्या असून त्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. वय वाढले हे कारण असू शकत नाही, कारण कामगिरी सरस असेल तर कोणत्याही खेळाडूला संधी मिळालीच पाहिजे. साहा याला संधी मिळाली असती तर ही वेळ व ही घटनाही घडली नसती. खेळाडूंना नाउमेद करण्यापेक्षा प्रोत्साहन देण्याबाबतही बीसीसीआयने गांभीर्य दाखवले पाहिजे.
कोहली विरुद्ध पाकिस्तानी पत्रकार
दुबईत झालेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात रोहित शर्मा शून्यावर बाद झाला होता. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत तत्कालीन कर्णधार विराट कोहलीला एका पाकिस्तानी पत्रकाराने असेच डिवचले होते. रोहितपेक्षा अन्य फलंदाजाला का खेळवले नाही, त्याने तर साफ निराशा केली, मग तू त्याला सुमार कामगिरी करत असल्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात वगळले का नाही, असे प्रश्न विचारले होते. मात्र, त्यावर कोहलीने या पत्रकाराला सडेतोड उत्तर दिले होते.
तुम्हाला वादग्रस्त गोष्टी माझ्याकडून काढून घ्यायच्या आहेत का, तसेच असेल तर मला आधी सांगा म्हणजे मी मुलाखत कशी द्यायची त्याचा विचार करून तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईन, असे सुनावले होते. अर्थात त्यावेळी कोहली भारतीय संघाचा कर्णधार होता, साहाबाबतची परिस्थिती भिन्न होती. साहाने अखेर दाखवलेली हिंमत कौतुकास्पद असून येत्या काळात अशा मुलाखतींसाठी धमक्यांचा नवा पायंडा पडायच्या आतच त्याचा प्रतिबंध केल्याने बीसीसीआयचेही कौतुक करायला हवे.
अमित डोंगरे