आखाड्यात जसे दोन तुल्यबळ मल्ल एकमेकांवर डाव प्रतिडाव टाकत असतात, तसेच आपल्या आयुष्यातील अनुकूल व प्रतिकूल घटक एकमेकांवर डाव टाकत असतात. पण आपण आपल्या मनोदेवतेच्या पाठिंब्याने प्रतिकूल घटकांवर कशी मात करावयाची त्याविषयी थोडेसे…
आपल्या आयुष्यात आपण काहीतरी करून दाखविण्याची धडपड करीत असतो. आपण ठरविलेले “लक्ष्य’ साध्य करण्यात आपल्याला अनेक बाधा येऊ शकतात. किंबहुना येतातच. मग अशा बाधांना घाबरून पळून जायचे नसते. “जर आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करीत असताना अडचणींचा सामना करावा लागला तर समजावे की आपण योग्य मार्गावर आहोत आणि जर काहीच अडचणी आल्या नाहीत तर अर्थात आपण चुकीच्या मार्गावर आहोत,’ असे स्वामी विवेकानंद यांनी सांगून ठेवलेले आहे.
“आपल्या सभोवताली असलेले प्रतिकूल घटक कमी करणे’ एवढे जरी केले तरी पुष्कळ झाले. जरी अनुकूल घटक निर्माण करता आले नाहीत तरी चालेल. दुसऱ्या शब्दात आपण सामान्य पातळीवर उभे असणे एवढेही पुष्कळ असते. पण सामान्य पातळीच्या खाली जर उभे असू तर खालून प्रथमतः सामान्य पातळीवर येणे आणि तेथून पुढे असामान्य पातळीवर पोहोचणे यासाठीसुद्धा खूपच कष्ट घ्यावे लागतात. आणखी विस्ताराने सांगायचे तर एका परीक्षेत “उणे गुणदान’ पद्धत आहे. म्हणजे उत्तर चुकले तर गुण कमी होणार. उत्तर बरोबर आले तर अर्थातच गुण वाढणार. मग अशा परीक्षेत जर आपण सुरुवातीची काही उत्तरे चुकल्यामुळे “- 10 गुण’ घेतलेले आहेत, तर “0′ या सामान्य पातळीवर येण्यासाठी आपल्याला पुन्हा 10 गुणांची कमाई करावी लागेल आणि तिथून पुढे आणखी बरोबर उत्तरे देऊन आपण “+10 गुण’ मिळविले. वास्तविक आपण “+20 गुण’ मिळविले तरी आपण “+10 गुण’ या पातळीवर येऊन थांबलो. याला कारण काय? याला कारण हेच की आपण सुरुवातीला “चुकीची उत्तरे देऊन’ 10 गुणांचे नुकसान करून बसलो. पण हेच जर आपण चुकलो नसतो, तर आपण “+20 गुण’ या पातळीवर जाऊन पोहोचलो असतो.
आता आपल्या बाबतीत विचार करायचा झाला तर, आपणही आपल्या सभोवातलचे “प्रतिकूल घटक’ जर कमी केले किंवा संपविले तर तीही एक उपलब्धी होऊ शकते. म्हणजेच आपण “0′ गुणावर असणे हेही एक प्रकारे चांगले असते तेथून पुढे सुरुवात केली तर मिळणारा प्रत्येक गुण हा आपल्याला प्रगतीकडे घेऊन जातो. यासाठी आपणच सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत. केवळ “चांगले दिवस येतील…’ असे गृहित धरून हाती असलेला वेळ वाया घालविणे म्हणजेच आपल्याच पायावर धोंडा मारण्यासारखे आहे. आपण स्वतः काही चुकीचे काम करावयाचे नाही, चुकीचे निर्णय घ्यायचे नाही. तर आपण मिळविलेला प्रत्येक गुण हा आपल्याला प्रगतीकडेच घेऊन जाणारा असतो. थोडक्यात, आपण आपले भांडवल शाबूत ठेवले म्हणजे झाले, फायदा नाही झाला तरी चालेल. जास्त फायदा मिळविण्याच्या नादात भांडवलही गेले असे होता कामा नये.
आपल्याकडील सर्वच प्रतिकूल घटक काही कमी करता येणार नाही, पण असेही काही प्रतिकूल घटक असतात की जे आपण सहज कमी करू शकतो. समजा आपल्याभोवती अशी काही माणसे असतात की जी कायम नकारात्मकच विचार करत असतात, नकारात्मकच बोलत असतात. अशी ही “नाना’ माणसे असतात. एखाद्यावेळी आपल्याबाबतीत काही नकारात्मक घडले असेल, आपला एखादा प्रयत्न फसला असेल, आणि नेमके याच वेळी अशा एखाद्या “नाना’च्या सहवासात आलो तर त्याचा नकारात्मक असलेला “स्थायी भाव’ आपल्यावर नकळतपणे छाप पाडून जातो. त्यामुळे आपण एखाद्यावेळेस आपले “लक्ष्य’ गाठण्याचा विचारच सोडून देऊ शकतो. पण आपण एकच करावयाचे की अशा “नाना’ माणसांचा सहवास टाळायचा! हा एवढा सोपा उपाय केला की आपला एक प्रतिकूल घटक कमी झाला. असे आणखीही काही घटक आपण विनासायास कमी करू शकतो.
एक अनुकूल घटक आपोआपच इतर काही प्रतिकूल घटक कमी करू शकतो. जसे आपल्याला वाहन चालविता येत असेल तर आपण चालकावर अवलंबून राहत नाही. ऐन निकडीच्या वेळी जर आपला चालकच कामावर आला नाही तर आपण अडून पडत नाही. शिवाय गाडीची अवस्था कशी आहे हेही आपल्या लक्षात येते त्यामुळे वेळीच आपण तेल-पाणी, दुरुस्त्या करून पुढील संभाव्य अडचणी टाळू शकतो, ही अतिरिक्त जमेची बाजू झाली. म्हणजेच केवळ “वाहन चालविता येणे’ या एका अनुकूल घटकामुळे आपण इतर प्रतिकूल घटक निर्माणच करू दिले नाही म्हणजे आपल्या ध्येयाप्रतीच्या मार्गातील काटे कमी झाले.
फलंदाज केवळ षटकार, चौकार मारून शतक पूर्ण करत नाही, तर एकेरी, दुहेरी धावाही जोडत असतो. ऑस्टेलियाचे क्रिकेटपटू बील वुडफील यांनी वर्ष 1926 मध्ये इंग्लंडविरुद्ध ओव्हल मैदानावर नाबाद 118 धावा काढल्या पण त्यात एकही चेंडू सीमापार मारला नाही. येथे एक लक्षात घ्यावे की जे घटक आपल्याला नगण्य वाटू शकतात ते नगण्य नसतात. असे नगण्य घटक जर सुसूत्रबद्ध पद्धतीने एकत्रित आणले तर मोठे काही साध्य होऊ शकते.
आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी किरकोळ प्रतिकूल-अनुकूल घटकांना दुर्लक्षित केले आहे असे करावयाचे नाही. किंबहुना ते किरकोळ नसतातच. जसे फिरणाऱ्या चाकाला आपण वंगण घालतो, त्यामुळे अंशतः का होईना चाकाची गती वाढते, तसेच आहे, एखादा छोटासा अनुकूल घटक आपलासा केला म्हणजे थोडा तरी सकारात्मक परिणाम तो आपल्यावर करणारच. त्याबरोबरच चाक अक्षाला अडकवून ठेवणारा एखादा छोटासा खिळा जर लक्ष न दिल्यामुळे पडला तर चाकच निसटू शकते. म्हणूनच सर्वकाही समान महत्त्व देऊनच आपले लक्ष्य साध्य करावयाचे आहे.
आपण कोणतेही “लक्ष्य’ गाठण्याचा प्रवास सुरू करण्यापूर्वी आपल्या मनोदेवतेच्या गाभाऱ्यात बसून एवढेच मनन करावयाचे आहे की, आपले अनुकूल घटक कोणते आहे आणि ते अबाधित कसे राहतील, तसेच आपले प्रतिकूल घटक कोणते आहेत आणि ते नष्ट तरी कसे होतील किंवा अनुकूल तरी कसे होतील? अनुकूल प्रतिकूल घटकांच्या चालणाऱ्या या द्वंद्वात आपण अनुकूल घटकांना कसे जिंकून देऊ शकतो याचा विचारा करावयाचा आहे आणि अशाच विचार पुष्पांनी आपण आपल्या मनो देवतेची आराधना करावयाची, मग यश आपलेच आहे.
– अनिकेत भालेराव