पिंपरी – महापालिका निवडणुकीमध्ये सर्वांना बरोबर घेऊन लढायचा आमचा विचार आहे. मात्र बरोबरच्या पक्षांनी अवास्तव मागण्या केल्या तर आघाडी होणे अवघड आहे. तशा काही मागण्या आल्या तर राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी (दि. 26) पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने राज्यभरामध्ये परिवार संवाद यात्रा सुरू करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने आज पाटील यांनी पिंपरी चिंचवड शहरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पाटील बोलत होते.
आगामी महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकत्रित लढणार की तीनही पक्ष स्वतंत्र लढणार याबाबत राजकीय वतुर्ळात तर्क-वितर्क लावले जात आहेत. याबाबत विचारले असता जयंत पाटील यांनी सूचक वक्तव्य करत मित्र पक्षांना इशारा दिला.
ते म्हणाले. स्थानिक पातळीवर पदाधिकारी आणि आम्ही बसून याबाबत निर्णय घेणार आहे. आमची भूमिका सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचीच आहे. मात्र समोरून पूर्ण न करता येणाऱ्या अपेक्षा आल्या तर विचार करावा लागेल असा सूचक इशारा पाटील यांनी मित्र पक्षांना दिला.
पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये राष्ट्रवादीच्या विचाराचे लोक पाठवायचे आहेत त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांने काम केले पाहिजे. महापालिकेच्या निवडणुका होतील मात्र 2024 च्या विधानसभा निवडणुकीवर देखील लक्ष द्यायचे आहे. 2024 साली राज्यातील सर्वात मोठा पक्ष राष्ट्रवादी असला पाहिजे त्यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची फळी उभारली जाणार आहे. त्यासाठीच परिवार संवाद यात्रेमधून प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन तेथील कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहोत. त्यांच्या अडचणी व सरकारकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेऊन त्यावर काम करण्यात येणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
विरोधकांनाही आम्ही सन्मानाने वागवतो
महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून याबाबत चौकशी लावणार का असे विचारले असता पाटील म्हणाले, गेल्या पाच वर्षांमध्ये महापालिकेत भ्रष्टाचार झाला असल्याचे वारंवार समोर आले आहे. त्याबाबतचे पुरावे जमा करण्याचे काम सुरू आहे. काही पुरावे आमच्याकडे आले आहेत त्यावर सत्ताधारी भाजपची चौकशी केली असती मात्र आम्ही विरोधकांनाही सन्मानाने वागवतो. मुद्दाम कोणाला त्रास देण्याची महाविकास आघाडी सरकारची संस्कृती नसल्याचे पाटील यांनी सांगितले.