माणसे फुले वाटतात त्यांच्या हातांना नेहमी सुगंध दरवळत असतो.’ या सुभाषिताचा प्रत्यय मला नुकताच आला त्याची गोष्ट…
गेल्या आठवड्यात सांगली जिल्ह्यातील कडेगाव या गावी एका कार्यक्रमासाठी मी सपत्नीक निघालो होतो. कडेगाव हे गाव कराड विटा रस्त्यावर कराडपासून साधारणपणे 25 किलोमीटर अंतरावर आहे. नियोजित कार्यक्रमाची वेळ सकाळी लवकर असल्यामुळे कराड येथे मुक्काम करण्याचे ठरविले होते. ज्यांच्या आशीर्वादामुळे मी घडलो त्या कैलासवासी बापूंच्या घरी आनंदरावांना फोन करून आम्ही येत असल्याचे त्यांना सांगितले. त्यांच्या घरी पोहोचलो तेव्हा रात्रीचे साडेदहा वाजले होते. रस्त्यावरील गर्दीमुळे आणि टोल नाक्यावरील वाहनांमुळे आम्हाला पोहोचायला उशीर झाला होता. घरातील सगळेजण आमची वाट पाहत होते. आमचे यथोचित स्वागत झाले.
प्रत्येकाने आम्हा उभयताना वाकून नमस्कार केला. आज मितीला बापू हयात नाहीत पण त्यांचे संस्कार आनंदराव आणि त्यांच्या घरच्यांनी व्यवस्थितपणे जोपासले आहेत. रात्रीचे जेवण आटोपले तेव्हा साडेआकरा वाजले होते. विशेष म्हणजे रोज रात्री आठ वाजता जेवण करणारे या कुटुंबातील सर्वजण केवळ आमच्यासाठी जेवायचे थांबले होते. आम्ही सर्वांनी एकत्र जेवण केले. आनंदराव आणि त्यांच्या पत्नीने टिकविलेला हाही बापूंच्या संस्काराचा वारसा होता.
रात्री अंथरुणावर पडल्यावर मला डोळ्यांसमोर बापू दिसू लागले. घरच्या गरिबीमुळे 1963 साली आकरावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या फॉर्मसाठी लागणारी 21 रुपये फी भरणे माझ्यासाठी केवळ अशक्यप्राय गोष्ट होती. माझ्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती. हालाखीची होती. त्यावेळी बापू अक्षरश: देवासारखे धावून आले होते. त्यांनी मदत केल्यामुळे मी परीक्षेचा फॉर्म भरू शकलो होतो. पुढे नोकरीला लागल्यानंतर घरच्या आठराविश्वे दारिद्य्रावर मात करून पुढील आयुष्य स्थिरस्थावर करू शकलो.
बापूंच्या आठवणी डोळ्यासमोर तराळत असतानाच मी झोपेच्या आधीन झालो. सकाळी लवकरच कडेगाव येथील कार्यक्रमाला जायचे असल्यामुळे पहाटेच उठून स्नान करून तयार झालो. विशेष म्हणजे आनंदराव आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब देवाची पूजा अर्चा आटोपून कामाला लागले होते. चहा नाश्ता तयार होता. बापू करीत असत अगदी तसाच आग्रह करून आनंदराव आणि त्यांची पत्नी आम्हाला नाश्ता वाढत होते. आठ वाजण्याच्या सुमाराला आम्ही त्यांच्या घरातून बाहेर पडलो.
निघताना कुटुंबातील प्रत्येकाने पुन्हा आमच्या पायावर डोके ठेवून नमस्कार केला. घरातून बाहेर पडलो त्या वेळी सगळेजण निरोप देण्यासाठी रस्त्यापर्यंत आले होते. गाडीत बसल्यावर त्यांचे आदरातिथ्य आठवू लागलो. कराड सोडल्यावर आमची गाडी कडेगावच्या दिशेने धावत होती. सुर्ली नावाचा छोटासा घाट लागला होता. घाटात छोटी छोटी वळणे होती. घाटरस्त्यातील प्रत्येक वळणावर माझे मन विचार करू लागले होते.
काळानुसार जग बदलत चाललंय. रुढार्थाने चालत आलेल्या जुन्या चाली रीती नाहीशा होत चालल्यात. सकाळी उठल्याबरोबर देवासमोर उभे राहून नमस्कार करणे, आई, बाप त्याचप्रमाणे घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेणे, मोठ्यांसमोर नतमस्तक होणे या गोष्टी कालबाह्य होत चालल्यात. संध्याकाळी देवासमोर दिवा लावून शुभंकरोती, भीमरूपी महारुद्रा तसेच रामरक्षा म्हणून देवाचा तसेच घरातील कर्त्या मंडळीचा आशीर्वाद घेणे या गोष्टी दुरापास्त होताना दिसताहेत.
उलटपक्षी चंगळवाद मोकाट वाढत चाललाय. पिढीच्या पिढी व्यसनात गुरफटून बरबाद होताना आढळतेय. सासू सुनांची भांडणे, कुटील कारस्थाने, अनैतिक संबंध, व्यसनाधीनता या गोष्टी छोट्या पडद्यावर दररोज राजरोसपणे बघताना कुणालाच कसलाही संकोच वाटेनासा झाला आहे. अशा काळात आनंदरावांचे घर एक अतिशय दुर्मिळ असा सुसंस्कारांचा ठेवा सांभाळत आहे. स्वर्गवासी बापूंचे आचार आणि विचार जपले जात आहेत, ही गोष्ट निश्चितच आनंददायी आहे.
बापूंची आठवण झाल्यावर माझ्या नजरेसमोर एक सुंदर असे रूपक सुभाषित नेहमी ताल धरून नाचू लागते. “परमेश्वराच्या कृपेने आपल्याला आवश्यक असलेले आपल्या ताटात जेवढे अन्न वाढले जाते तेवढेच खाणे म्हणजे प्रकृति. आपल्या ताटात वाढलेले अन्न संपवून दुसऱ्याच्या ताटातल्या अन्नावर डोळा ठेवणे म्हणजे विकृति आणि आपल्या ताटातल्या अन्नाच्या घासातला घास काढून दुसऱ्यांना देणे म्हणजे संस्कृति’ हे ते सुभाषित होय. बापू नेहमी आपल्या स्वत:च्या घासातला घास दुसऱ्याला देत असत.
बापूंच्या सुसंस्कारांचा ठेवा आदरपूर्वक जपून आचरणात आणणारे तसेच येणाऱ्या पिढीपुढे ठेवणारे आनंदराव मला नेहमी देवासमोरची आरती झाल्यावर फुले वाटणाऱ्या पुजाऱ्याप्रमाणे भासतात. जी माणसे फुले वाटतात त्यांच्या हातांना नेहमी सुगंध दरवळत असतो, असे म्हणतात ते खरेच आहे.
– बबन पोतदार