नगर, (प्रतिनिधी) – वैविध्यपूर्ण अशा भारतीय संस्कृतीच्या धाग्याने आपला देश बांधला गेला आहे. राज्यालाही या सांस्कृतिक वारशाची मोठी परंपरा आहे. महासंस्कृती महोत्सवाच्या माध्यमातुन आपली संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी निश्चित मदत होईल, असा विश्वास राज्याचे महसुल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
शहरातील भिस्तबाग महल, सावेडी येथे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग तसेच जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महासंस्कृती महोत्सव’, कृषी व उमेद महिला बचतगट महोत्सवाचा शुभारंभ पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते.
या वेळी खासदार सदाशिव लोखंडे, खा. डॉ.सुजय विखे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सलीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री विखे म्हणाले, आपल्याकडे ६४ कला व १४ विद्या आहेत. या माध्यमातून सांस्कृतिक क्षेत्राने नवा आकार घेतला आहे. राज्याच्या संस्कृतीचे सर्वांगीण दर्शन व्हावे यासाठीच शासनाने राज्यातील सर्व जिल्ह्यात सांस्कृतिक महोत्सव आयोजित करत जिल्ह्यातील कलाकांराना तसेच लोककलांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे.
नगर जिल्ह्याला फार मोठा ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक वारसा आहे. तसेच साहित्यिक, कलाकार, नाट्यप्रेमींची मोठी संख्या आहे. जिल्ह्याच्या भूमीत साहित्य निर्माण करणाऱ्या साहित्यिकांची परंपरासुद्धा उज्ज्वल आहे. लेखक, कवी, विचारवंतांनी आपापल्यापरिने साहित्याची उंची वाढविण्यासाठी मोठे यशस्वी प्रयत्न केले असल्याचेही पालकमंत्री विखे यांनी सांगितले.
आपल्या जिल्ह्याच्या आदिवासी क्षेत्रानेही निसर्गाबरोबरच संस्कृतीचा जपलेला वारसाही खुप मोठा आहे. जिल्ह्याच्या खाद्यसंस्कृतीने निर्माण केलेली ओळख ही देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली आहे. प्रत्येक तालुक्याचे असलेले खाद्य वैशिष्टय एकत्रित समजावे म्हणूनच या सांस्कृतिक महोत्सवाबरोबरच आयोजित केलेला हा खाद्य महोत्सव हा जिल्ह्याचे वेगळेपण निश्चित दाखवून देईल,
असा विश्वासही पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. गावामध्ये शासनाच्या योजना पारदर्शीपणे राबवुन गावाचा सर्वांगिण विकास करत शासनाची प्रतिमा उंचावण्याचे काम ग्रामसेवक व तलाठी यांच्यामार्फत व्हावे, अशी अपेक्षाही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले, बचतगटांच्या माध्यमातुन महिलांचे एकत्रीकरण करत त्यांचा विकास साधण्यासाठी शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. आपला जिल्हा दुग्धोत्पादनामध्ये राज्यात अग्रेसर असुन दुध उत्पादक शेतकऱ्यांना पालकमंत्री विखे पाटील यांच्या पुढाकारातुन पाच रुपयांचे अनुदान देण्याचा शासनाने निर्णय घेतला असल्याचे सांगत पुरस्कारप्राप्त सर्व ग्रामपंचायती व ग्रामसेवकांचे त्यांनी अभिनंदनही केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आषिश येरेकर यांनी महोत्सव आयोजनामागची भूमिका विषद केली. यावेळी आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव व आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरणही पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.