नवी दिल्ली – दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत रंग भरत चालला असताना आता दिल्ली भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष व खासदार मनोज तिवारी यांनी केलेल्या विधानामुळे वेगळाच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे कोणीही डोळे फोडू शकते अथवा पाय तोडू शकतो. त्यामुळे त्यांना चांगली सुरक्षा दिली जावी अशी विनंती आपण गृहमंत्री अमित शहा यांना करणार असल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले, चार दिवसांपूर्वी त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचेच आमदार गुलाबसिंह यादव यांना मारहाण केली. केजरीवालांनाही त्यांच्या कर्माची शिक्षा मिळू शकते. लोक त्यांनाही मारहाण करू शकतात. त्यामुळे माझी गृहमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी केजरीवालांना सुरक्षा पुरवावी.
दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांच्या प्रमाणे त्यांनी राहुल गांधी यांच्याबाबतही वक्तव्य केले. राहुल गांधी सद्दाम हुसेन यांच्यासारखे दिसत असल्याचे तिवारी म्हणाले.
केजरीवालांच्या हत्येचा कट
तिवारी यांच्यावर आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी टीका केली आहे. भारतीय जनता पार्टी निवडणूक तर जिंकू शकत नाही. मात्र ते केजरीवाल यांच्या हत्येचा कट रचत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. केजरीवालांचे हात पाय तोडण्याचा कट आखला जातो आहे. डोळे फोडण्याचे बोलले जाते आहे. मात्र तरीही निवडणूक आयोग गाढ झोपेत असल्याचे संजय सिंह यांनी म्हटले आहे.