नवी दिल्ली – लवकरच दिल्ली पालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. पण, त्याआधीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.
शहा यांनी गुरूवारी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना केजरीवाल यांच्या आप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. दिल्ली आपनिर्भर असावी असे केजरीवाल सरकारला वाटते. त्याउलट, देशाची राजधानी आत्मनिर्भर बनावी, अशी भाजपची इच्छा आहे.
केजरीवाल सरकार प्रसिद्धीसाठी प्रचंड खर्च करते. ते सरकार जाहिरातींचे राजकारण करते. आम्ही विकासाचे राजकारण करतो. दिल्ली पालिकेचे एकत्रीकरण होण्याआधी तीन पालिका अस्तित्वात होत्या. त्या पालिकांना केजरीवाल सरकारने सावत्रपणाची वागणूक दिली, असा आरोप शहा यांनी केला.
Diwali 2022 : छत्तीसगडच्या ‘या’ गावात आठवडाभर आधी साजरी होते दिवाळी? जाणून घ्या यामागचं कारण …
त्यानंतर आपचे प्रमुख केजरीवाल यांनी ट्विटरवरून शहांना प्रत्युत्तर दिले. दिल्लीतील पालिकांमध्ये भाजपची 15 वर्षे सत्ता होती. त्या पालिकांचा कारभार पाहण्यात आलेल्या अपयशाबद्दल भाजपने कारणे देऊ नयेत. त्या पक्षाला पुन्हा पालिकेची सत्ता हवीयं. पण, जनता त्या पक्षावर विश्वास का दाखवेल? भाजपला जे जमले नाही; ते आप करून दाखवेल, असे केजरीवाल यांनी म्हटले.