मुंबई – नवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करणारे भाजपचे अनेक पोस्टर्स राज्यभरात झळकले. त्यातील काही पोस्टर्सवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या छायाचित्राला स्थान मिळाले नाही. संबंधित पोस्टर्सवर फडणवीस यांच्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या छायाचित्रांना स्थान मिळाले.
मात्र, शहांचे छायाचित्र गायब असल्याने कुजबूज सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्रिपदी बोळवण करून फडणवीस यांचे पंख छाटण्यात आल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली आहे.
फडणवीस यांची राजकीय उंची कमी करण्याच्या प्रयत्नांमागे शहा असल्याचे त्यांच्या समर्थकांना वाटत आहे. त्या भावनेचे प्रतिबिंब पोस्टर्सवर उमटल्याचे मानले जात आहे.
अस्वस्थता इकडेही अन् तिकडेही!
सत्तासंघर्षानंतर राज्यात सत्ताबदल झाला. सत्तेवरून जावे लागल्याने शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांत अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविकच आहे. पण, सत्ता मिळूनही प्रदेश भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण दिसत नाही. त्याला कारण ठरलीय ती नव्या सरकारची रचना.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याची वेळ आल्याने ते स्वत: आणि त्यांचे समर्थक नाराज असल्याचे दडून राहिलेले नाही.
तर, ज्या मुख्यमंत्रिपदासाठी युती तुटली ते पद आता भाजपने का सोडले, अशा आशयाचा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. भाजपने शब्द पाळला असता तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता, असे म्हणत त्यांनी भाजपच्या राजकीय निर्णयांविषयी नाराजी व्यक्त केली. त्या घडामोडी पाहता अस्वस्थता इकडेही अन् तिकडेही दिसते.