आळंदी – आनुंदे रे आजि आनंदु रे। सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदु रे।। वारकरी संप्रदायाचे प्रतीक असलेली तुळशीमाळ, हातात भगव्या पताका मुखाने हरिनामाचा गजर करीत यावर्षी करोनाच्या सावटात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखीने प्रस्थान ठेवले. जमावबंदी, संचारबंदीसह पोलीस बंदोबस्तात माऊलींच्या पादुकांचे प्रस्थान पंढरी भक्तमार्गातील दैवत श्री विठ्ठल भगवान पांडुरंगाचे दर्शन आणि वारीला जाण्यास माऊली मंदिरातील विना मंडपातून शुक्रवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास हरिनाम गजरात झाले.
अलंकापुरीत प्रस्थान सोहळ्यापूर्वी परंपरांचे पालन करीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये मंदिरात पहाटे काकडा आरती, पवमान अभिषेक झाला. मंदिरात भाविकांना दर्शनास बंदी असल्याने यावर्षी “श्रीं’चे संजीवन समाधी दर्शनास भाविक वंचित राहिले. दरम्यान, नऊ वाजता वीणा मंडपात परंपरेने कीर्तन सेवा झाली.
दुपारी परंपरेने मंदिरात “श्रीं’ना महानैवेद्य झाला. “श्रीं’चे मंदिरात माऊलींच्या समाधीवर ब्रह्मवृंदाच्या वतीने “श्रीं’नां वैभवी पोशाख झाल्यानंतर श्री गुरू हैबतरावबाबांच्या वतीने माऊलींच्या समाधीची परंपरेने आरती हरिनाम गजरात झाली. दरम्यान “श्रीं’चे वैभवी चांदीचे पादुका प्रस्थान पूर्व चल पादुकांची विधिवत प्रतिष्ठापना झाली. “श्रीं’चे संजीवन समाधी गाभाऱ्यात आळंदी देवस्थानच्या वतीने परंपरेने मानकरी यांना नारळ प्रसाद देण्यात आला. विना मंडपातून सायंकाळी पंढरीकडे प्रस्थान ठेवले.
दिंड्यांऐवजी स्थानिक प्रतिनिधींना प्रवेश
यावर्षी पालखी पायी वारी सोहळा रद्द झाल्याने सोहळ्यातील इतर कार्यक्रमांना फाटा देण्यात आला आहे. सोहळ्यास यावर्षी थेट सुरुवात करण्यात आली. दरवर्षी प्रस्थान दिनी दुपारी अडीच ते साडेतीनच्या सुमारास श्रींचे रथापुढील आणि रथामागील मानाच्या 47 दिंड्यांना देऊळवाड्यात सोहळ्यातील परंपरेप्रमाणे चोपदार यांचे सूचनांप्रमाणे महाद्वारातून प्रवेश देण्यात येतो; मात्र यावर्षी दिंड्यांऐवजी संबंधित घटकांचे स्थानिक प्रतिनिधी यांना प्रवेश देण्यात आला.
आजोळघरी मोठा मुक्काम
माऊलींचे पादुकांचे हरिनाम गजरात मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर “श्रीं’चे पादुका आजोळघरा लगतच्या दर्शनबारीतील सभागृहात हरिनाम गजरात आणण्यात आल्या. येथे सोहळ्यातील परंपरांचे पालन करीत समाज आरतीने “श्रीं’चा पालखी सोहळा विसावला. आळंदीत यावर्षीही करोनाचे संकटामुळे सोहळा आळंदीतच मुक्कामी राहणार आहे.
19 जुलैला होणार चल पादुकांचे प्रस्थान
सोमवारी (दि. 19) “श्रीं’चे चल पादुका बसने पंढरपूरला आषाढी एकादशी सोहळ्यास मार्गस्थ होणार आहे. यावर्षीची पायी वारी रद्द झाल्याने अनेक वारकरी वारीला जाण्याची इच्छा असूनही सुरक्षिततेच्या कारणास्तव न जाता घरी राहून वारीत “श्रीं’चे दर्शन थेट प्रक्षेपणातून घेतले. यासाठी नियोजन करण्यात आले होते.