पुणे – राज्यात तीन जिल्हे वगळता जूनमध्ये पावसाने सर्वदूर दमदार हजेरी लावली. मान्सूनच्या आगमनानंतर राज्यात सरासरीपेक्षा 31 टक्के, तर पुण्यात सरासरीच्या 49 टक्के अधिक पावसाची हवामान विभागाकडे नोंद झाली आहे.
यंदा जून ते सप्टेंबर काळात महाराष्ट्रात सामान्य पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विशेषत: राज्यात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर, पावसाने चांगलीच हजेरी लावली होती.
आता 6 – 7 जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता आहे. या दरम्यान तुरळक पावसाचा अंदाजदेखील विभागाने वर्तविली आहे.
राज्यातील सातारा, कोल्हापूर, जालना, परभणी या चार जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा 60 टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. तर धुळे, नंदूरबार आणि अकोला हे तीन जिल्हे वगळता सर्व जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.