बलिया – उत्तरप्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार राम इक्बाल सिंह यांनी शेतकरी आंदोलनावरून भाजपला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, शेतकरी आंदोलनाच्या पहिल्या 30 दिवसांच्या आतच कृषी कायदे मागे घेतले गेले असते तर तेथे आंदोलनात जे 700 हून अधिक शेतकरी मरण पावले तो प्रकार झाला नसता.
राम इक्बालसिंह हे भाजपच्या प्रदेश कार्यकारीणीचे सदस्य आहेत. त्यांनी कंगना राणावत हिच्या वक्तव्यावरही टीका केली आहे. ती एक मनचली ऍक्टर आहे असे त्यांनी म्हटले आहे. तिच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कारवाई केली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या सर्वच मागण्या मान्य केल्या पाहिजेत असेही त्यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाखांची मदत दिली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. जर मृत शेतकऱ्याचे अवलंबीत अशिक्षित असतील आणि त्यांना नोकरी धंदा लागण्याची शक्यता नसेल त्यांना सरकारने दरमहा 20 हजार रूपयांचे मानधन सुरू केले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.
ऐन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राम इक्बालसिंह यांनी शेतकऱ्यांची बाजू घेत भाजपलाच घरचा आहेर दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुळात कृषी कायदे लागू करण्याच्या आधीच केंद्र सरकारने संबंधीत सर्व शेतकरी संघटनांशी चर्चा करायला हवी होती असेही त्यांनी नमूद केले आहे.