नवी दिल्ली – एकेकाळी नितीश कुमार यांचे निकटवर्तीय राहीलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी असा दावा केला आहे की नितीश कुमार पुन्हा एकदा कोलांटउडी मारू शकतात. ललन सिंह प्रकरणाची कथा दोन-तीन महिन्यांपूर्वीच लिहिली गेली होती. तेजस्वी यादव यांना बिहारचे मुख्यमंत्री केले जावे यासाठी एक गट नितीश कुमार यांच्यावर दबाव टाकत होता. तेजस्वी यांना मुख्यमंत्री करण्याचे विजेंद्र यादव आणि ललन सिंह हे दोघे समर्थन करत होते असे खळबळजनक दावे मांझी यांनी केले आहेत.
नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाचे नेते विजय चौधरी, अशोक चौधरी आणि संजय झा यांचे नाव घेत मांझी म्हणाले की, हे तीन जण कुठेनकुठे राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी अर्थात एनडीएशी समन्वय साधण्याच्या गोष्टी करतात. पक्षाचे माजी अध्यक्ष ललन सिंह यांनी अगोदरच अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र पक्षात बंडखोरी होऊ नये म्हणून राष्ट्रीय बैठकीतच याबाबतची माहिती स्पष्ट करण्यात आली.
ललन सिंह यांच्यासोबत पक्षाचे ११-१२ आमदार आहेत. मात्र बिहारमधील आजची स्थिती अशी आहे की सरकारमध्ये राष्ट्रीय जनता दलाचा वरचष्मा आहे कारण विधानसभा अध्यक्ष त्या पक्षाचा आहे. माझ्या माहितीनुसार नितीश कुमार केंव्हाही पलटी मारू शकतात. राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे आणि येथे काहीही घडू शकते.
मांझी पुढे म्हणाले की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी ठरवले की एनडीएमध्ये नितीश कुमार यांनी आमच्यासोबत राहावे तर आपण त्याला विरोध करणार नाही. प्रेम, युध्द आणि राजकारणात सगळे काही क्षम्य असते आणि सगळे चालते. ललन सिंह केवळ दिखाव्यासाठी पक्षात राहीले तर ते पक्षात नसल्यासारखेच असतील आणि त्यांची स्थितीही आरसीपी सिंह यांच्यासारखीच होईल. ज्याप्रमाणे आरसीपी पक्षातून बाहेर झाले तसेच ललन सिंहही पक्षातून बाहेर होतील.