पूंछ – जम्मू काश्मीरात निवडणूक घेण्यास कमालीचा विलंब होत असून राज्यातील जनतेला लोकनियुक्त सरकार हवे आहे त्यामुळे केंद्र सरकारने या राज्याला पुन्हा पूर्ण राज्याचा दर्जा देऊन येथे त्वरीत विधानसभा निवडणुका घ्याव्यात अशी मागणी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी केली आहे.
आज एएनआयशी बोलताना, ते म्हणाले की, मला आशा आहे की केंद्र सरकार जम्मू-काश्मीरच्या लोकांच्या अपेक्षा आणि आकांक्षा समजून घेईल आणि लवकरात लवकर निवडणुका घेईल. शेवटच्या निवडणुका २०१४ मध्ये झाल्या होत्या आणि लोक त्यांच्या बोटांना शाई लावण्यासाठी आणखी एका संधीची आतुरतेने वाट पाहत आहेत. निवडणूक आयोगानेच केंद्र सरकारला पुढच्या वर्षी सप्टेंबरपर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत, असे अब्दुल्ला यांनी सांगितले.
यापूर्वी, 11 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला पुढील वर्षी ३० सप्टेंबरपर्यंत जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुका घेण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश दिले होते. केंद्र सरकारने कलम ३७० चा काही भाग रद्द करताना जम्मू काश्मीरला असलेला विशेष राज्याचा दर्जा काढून घेतला होता व हा प्रदेश केंद्रशासित केला होता.