इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये हेरगिरीच्या आरोपावरून फाशीची शिक्षा सुनावलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्यासाठी वकिलाची नियुक्ती करायला भारतला आणखी एक संधी देण्यात यावी, असे निर्देश इस्लामाबाद उच्च न्यायालयाने आज तेथील प्रांतिय सरकारला दिले.
जाधव यांना लष्करी न्यायालयाकडून सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेचा फेरविचार करण्याच्या खटल्यासाठी वकिलाची नियुक्ती करण्याबाबतच्या प्रकरणात न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत.
भारतीय नौदलातून निवृत्त झालेले कुलभूषण जाधव यांना एप्रिल 2017 मध्ये हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपांखाली पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. मात्र या शिक्षेचा पारदर्शक आणि निःपक्षपाती वातावरणात फेरविचार करण्यात यावा, असे निर्देश हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिले आहेत.
हेग येथील न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्यासाठी जाधव यांना भारतीय दूतावसातील अधिकाऱ्यांची भेट घेण्याची परवनगी देण्यात आली आहे, असे पाकिस्तान सरकारचे ऍटर्नी जनरल खलिद जावेद खान यांनी उच्च न्यायालयात सांगितले. मात्र वकिलाची नियुक्ती करण्याबाबत पाकिस्तान सरकारने दिलेल्या प्रस्तावावर भारताकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही, असेही खान यांनी सांगितले.
दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने जाधव यांच्याबाबतचे आदेश भारताला पाठवण्याचे आदेश पाकिस्तान सरकारला दिले आणि सुनावणी 3 ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली. जाधव यांच्या शिक्षेच फेरविचार करण्यासाठी पाकिस्तनने एक विशेष कायदा आणला आहे.
जाधव हे इराणमधून पाकिस्तानमध्ये आल्यानंतर त्यांना बलुचिस्तान प्रांतात 3 मार्च 2016 रोजी अटक केली गेली, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. तर जाधव नौदलातून निवृत्त झाल्यावर इराणमध्ये व्यवसायासाठी गेले होते. तेथूनच त्यांचे अपहरण झाले होते, असे भारताचे म्हणणे आहे.