पुणे – लॉकडाऊनमुळे बंद असणारी पुणे महानगर परिवहन महामंडळाची सेवा गुरूवारी “रिस्टार्ट’ झाली. सुमारे पाच महिन्यानंतर धावलेल्या पीएमपीला चांगला प्रतिसाद मिळाला. गुरूवारी दुपारपर्यंत सुमारे अडीच हजारांहून अधिक फेऱ्या झाल्या असून यातून पीएमपीला सुमारे 5 लाखांहून अधिक उत्पन्न मिळाले आहे.
मार्चपासून पीएमपीच्या प्रवासी वाहतुकीला स्थगिती दिली होती. या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बस प्रवासास मुभा दिली होती. मात्र, अनलॉकनंतर पीएमपी सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. याच पार्श्वभूमीवर गणेशोत्सवानंतर प्रवासी सेवा सुरू करण्याचा निर्णय पीएमपी आणि महापालिका प्रशासनाने घेतला होता.
गुरूवारपासून पीएमपीचे संचलन सुरू झाले. महापौर मुरलीधर मोहोळ, पीएमपीचे संचालक शंकर पवार, व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप यांनी पहिल्या दिवशी बसेसची पाहणी केली. यावेळी मोहोळ यांना प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत पीएमपीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
गुरुवारी सकाळच्या सत्रात पीएमपीच्या 477 बसेसच्या माध्यमातून 2 हजार 548 फेऱ्या झाल्या. यातून 34 हजार 443 जणांनी प्रवास केला असून, याद्वारे 5 लाख 56 हजार 924 रुपयांचे उत्पन्न मिळाले असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाने दिली. यासह पास विभागाद्वारे सकाळच्या सत्रात सुमारे 93 हजार 915 रुपयांचे प्राप्त झाले आहे. शहरातील काही मार्गांवर अल्प, तर मनपा, कात्रज, निगडी अशा काही गर्दीच्या मार्गांवर चांगला प्रतिसाद मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.