मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागासाठी दहा हजार कोटी रूपये मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. येत्या दिवाळीपर्यंत ही मदत संबंधितांपर्यंत पोहोचेल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दहा हजार रुपये आणि फळबागायतदारांना प्रति हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत मिळणार आहे. पावसामुळे राज्यातील रस्ते आणि काही ठिकाणच्या पुलांचेही मोठे नुकसान झाले असून त्यासाठीही या निधीतून मदत दिली जाणार आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य सरकारपुढे आर्थिक अडचण असतानाही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचे नाही ही आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे त्या भूमिकेतून केंद्राची मदत यायच्या आधीच आम्ही ही मदत जाहीर करीत आहोत. अतिवृष्टीमुळे राज्याचे बरेच नुकसान झाले आहे, त्यासाठी केंद्राने पहाणी पथक पाठवावे अशी मागणी आम्ही त्यांना वेळोवेळी केली आहे. पण त्यांचा अजून निर्णय झालेला नाही.
केंद्र सरकारकडून राज्याचे 38 हजार कोटी रुपयांचे येणे आहे तेही अजून आलेले नाहीत. या आर्थिक संकटाच्या काळात केंद्राकडून मदत मिळेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. सरकार आर्थिक अडचणीत असली तरी शेतकऱ्यांवर आम्ही संकट येऊ देणार नाही हा आमचा शब्द आहे. सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रु असू नयेत अशी आमची प्रामाणिक भूमिका आहे असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.