मुंबई – परिवहन विभागात बदल्यांचं रॅकेट चालत असून उपपरिवहन अधिकारी बजरंग खरमाटे हे बदल्या मॅनेज करत असून अर्थपूर्ण व्यवहार करत आहेत. त्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांचं अभय आहे. अशी तक्रार नाशिक येथील पंचवटी पोलिसात गजेंद्र पाटील यांनी दाखल केली आहे. या प्रकरणावरून परिवहन मंत्री अनिल परब यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.
संदिप देशपांडे म्हणाले की, ”१०० कोटी महावसूली आता ३०० कोटीवर ? परिवहन मंत्री परब यांच्या विभागाचे अधिकारी पाटील यांची नाशिक पंचवटी पोलिस स्टेशनात तक्रार, गृहमंत्री वळसे पाटील किमान निष्पक्ष चौकशी करणार का????” असा सवाल थेट त्यांनी राज्याचे गृहमंत्री वळसे पाटील यांना केला आहे. त्यामुळे परत एकदा अनिल देशमुख यांच्या 100 कोटी वसुली प्रकरणानंतर महाविकास आघाडीमध्ये अनिल परब यांचे प्रकरण समोर आले आहे.
परिवहन विभागात बदल्यांचं रॅकेट चालत असून उपपरिवहन अधिकारी बजरंग खरमाटे हे बदल्या मॅनेज करत असून अर्थपूर्ण व्यवहार करत आहेत. त्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांचं अभय आहे, असा दावा गजेंद्र पाटील यांनी केला असून याप्रकरणी त्यांना पंटवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पाटील हे नाशिक परिवहन विभागात मोटार वाहन निरीक्षक होते. पाटील यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन पंचवटी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या उपायुक्तांना दिले आहेत.