महापालिका प्रशासनाचेही दुर्लक्ष : स्वच्छ सर्वेक्षणात कशी मारणार बाजी?
पिंपरी – देशभरामध्ये स्वच्छ शहर अंतर्गत सर्वेक्षण सुरू आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये दोन लीग पूर्ण झाल्या आहेत. पहिल्या लीगमध्ये शहराने सहावा क्रमांक मिळविला होता. तर दुसऱ्या लीगमध्ये शहर चौदाव्या क्रमांकावर फेकले गेले. तिसऱ्या लीगमध्ये स्वच्छ सर्वेक्षणामध्ये शहराने बाजी मारावी, यासाठी आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली आहे. मात्र असे असले तरी प्रशासनाने मुख्य बाबींकडेच दुर्लक्ष केले असल्याचे समोर आले आहे.
स्वच्छ शहरमध्ये कचऱ्याचे व्यवस्थापन करणे, ओला व सुका कचरा वेगळा करणे, रस्त्यांची पदपथांची सफाई करणे या बाबींचा समावेश होतो. मात्र याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यासोबतच ओला व सुका कचरा वेगळा करण्यामध्ये नागरिकांची अनास्था समोर आली आहे. सोसायट्यांमधील नागरिक कचऱ्या विलगीकरण करत नाहीत. कचरा वाहून नेण्यासाठी कचरागाडी आल्यावर त्यामध्ये ओला व सुका असा एकत्रित कचरा टाकला जातो. वाहनांमध्ये कचऱ्याचे विलगीकरण करण्यासाठी दोन स्वतंत्र विभाग बनविण्यात आले आहेत. मात्र कचरा वेगवेगळा न भरता नागरिक जसा एकत्रित आणून देतील तसाच कचरा वाहनांमध्ये भरला जातो. याबाबत नागरिकही काळजी घेत नाहीत, तसेच कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांमध्ये कचरा भरणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून तशी मागणी केली जात नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या वतीने जनजागृतीवर केलेला खर्च वाया जात असल्याचे समोर आले आहे.
स्वच्छ शहर सर्वेक्षणाच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. दुसऱ्या फेरीमध्ये शहर चौदाव्या क्रमांकावर फेकले गेले. त्यामुळे झालेल्या चुका टाळण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. नागरिकांपर्यत स्वच्छ सर्वेक्षणाची माहिती पोहचविण्यासाठी प्रशासनातर्फे जनजागृती करण्यात येत आहे. शहराच्या चौकात विविध ठिकाणी स्वच्छतेचे संदेश देणारे बॅनर लावले आहेत. सोशल मिडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत माहिती पोहचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र स्वच्छतेसाठी आवश्यक असलेल्या मुख्य बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
अनेक ठिकाणी स्वच्छतागृहांना कुलूप
शहर स्वच्छतेमध्ये उघड्यावरील शौचविधीचे निमूर्लन करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरामध्ये ठिकठिकाणी शौचालये बांधण्यात आली आहेत. मात्र शहरातील अनेक शौचालयांना कुलूप लावून ते बंद ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. शहरातील थरमॅक्स चौक, केएसबी चौक व एसकेएफ कंपनीजवळ असलेली महापालिकेची शौचालये कुलूप लावून बंद आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे तर स्वच्छतेचेही तीनतेरा वाजले आहेत.
मुख्य बाबींकडे लक्ष देण्याची आवश्यकता
स्वच्छ सर्वेक्षण 2020 या लीगमध्ये टॉप टेनमध्ये येण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. त्यासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आतापर्यंत जनजागृतीसाठी बॅनर लावणे, सोशल मीडियावर संदेश पाठवणे यासाठी खर्च करण्यात येतोय.स्वच्छतेचा संदेश देणारे बलून खरेदीसाठीही लाखो रुपये खर्च करण्यात येणार आहे. स्वच्छतेच्या मुख्य बाबींकडे दुर्लक्ष केले जात आहे. कचरा संकलन, ओला व सुका कचरा वर्गीकरण, कचऱ्यावर प्रक्रिया करणे या मुख्य बाबींवर लक्ष देणे आवश्यक आहे.