नवी दिल्ली – रशियाने अनेक भारतीयांना फसवून युक्रेन विरूध्दच्या युध्दात उतरवले असल्याचे एव्हान स्पष्ट झाले असून याची पुष्टी करणारी प्रकरणेही समोर येत आहेत. सोशल मीडियावर अशीच फसवणूक झालेल्या सात भारतीय युवकांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यांना रशियाने बळजबरीने युध्दात भरती करत युक्रेनच्या युध्दावर पाठवले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत हे युवक परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे मदतीची याचना करताना दिसत आहेत.
हे सात जण एका खोलीत लष्कराच्या गणवेषात दिसत आहेत. यातील एक जण त्यांच्यावर काय प्रसंग आला आहे याची माहिती देतो आहे. त्याच्या म्हणण्यानुसार नव्या वर्षानिमित्त ते सगळे जण २७ डिसेंबर रोजी रशियाला गेले होते. तेथे एका एजंटशी त्यांची ओळख झाली. रशियातील अनेक ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या व यात त्यांना त्या एजंटची मदत झाली. नंतर त्याने त्यांना बेलारूसलाही भेट देण्याचे सूचवले. मात्र बेलारूसला जाण्यासाठी व्हिसा लागतो याची आम्हाला कल्पना नव्हती असे तो युवक म्हणताना दिसतो आहे.
एजंटच्या म्हणण्यानुसार ते बेलारूसलाही गेले. त्याला त्याचे पैसेही दिले, मात्र त्याने जादा पैशांची मागणी केली. त्याच्या मागणीनुसार आम्ही त्याला पैसे न दिल्यामुळे त्याने आम्हाला हायवेवरच उतरवले. आमच्याकडचे पैसेही संपले असल्यामुळे त्याला द्यायला आमच्याकडे पैसेच नव्हते. त्यानंतर पोलिसांनी आम्हाला पकडले आणि रशियाच्या लष्कराच्या ताब्यात दिले. लष्कराने त्यांना तीन ते चार दिवस अज्ञात ठिकाणी ठेवले होते. आपली व्यथा पुढे मांडताना हा युवक सांगतो की नंतर त्यांना ड्रायव्हर म्हणून किंवा स्वयंपाकी म्हणून काम करण्याबाबतच्या करारावर स्वाक्षरी करायला लावली. करारातील भाषा त्यांच्या आकलनापलिकडची होती. करारावर सही केली नाही तर १० वर्षे कैदेची शिक्षा केली जाण्याची धमकीही देण्यात आली.
त्यानंतर या युवकांना एका प्रशिक्षण केंद्रात अर्थात ट्रेनिंग सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. तथापि, नंतर आम्हाला लक्षात आले की आपली खूप मोठी फसवणूक झाली आहे कारण आम्हाला थेट युक्रेनविरूध्दच्या युध्दातच उतरवण्यात आले होते. आम्ही आयुष्यात हातात कधी बंदुक घेतली नव्हती, आम्हाला ती चालवताही येत नाही. मात्र त्या लोकांचा आमच्यावर प्रचंड दबाव होता. भारत सरकारच आता आमची काही मदत करू शकेल अशी आम्हाला आशा असल्याचे या युवकांनी व्हिडिओत म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने याबाबत माहिती दिली होती. रशियाच्या लष्करात दाखल झालेल्या २० भारतीयांशी अधिकाऱ्यांची बोलणी झाली असून त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले जात आहेत. मॉस्कोतील अधिकाऱ्यांशीही परराष्ट्र मंत्रालयाची बोलणी झाली आहे. ज्या भारतीयांची फसवणूक झाली आहे त्यांनी कोणत्याही प्रकारे युध्दात जाण्याचे टाळावे असे त्यांना सांगण्यात आले आहे.