पिंपरी, दि. 18 – पिंपरी-चिंचवड शहरातील तृतीयपंथीयांचे शिष्टमंडळ गुरूवार (दि.17) रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र, या तृतीयपंथीयांच्या पथकाला मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील पोलिसांनी अडविले. यावेळी झालेल्या गोंधळामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचे तृतीयपंथीयांच्या शिष्टमंडळाकडे लक्ष गेले. मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वत: पुढाकार घेत शिष्टमंडळांला बोलवून काही वेळ थांबून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि निवेदन स्वीकारले. पोलीस भरतीमध्ये तृतीयपंथीयांना स्थान द्यावे, अशी मागणी रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली पोलीस भरती होणार आहे. अनेक तरूणांना पोलीस भरतीच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. मात्र, या भरती प्रक्रियेपासून तृतीय पंथी (ट्रान्सजेंडर) वंचित राहणार असल्याचे दिसून येते. पोलीस भरती प्रक्रियेमध्ये तृतीयपंथी यांना भरती संदर्भात कसलाही उल्लेख नाही. आज तृतीयपंथी सर्व क्षेत्रामध्ये आपली कामगिरी बजावताना दिसत आहेत. तृतीयपंथी विविध ठिकाणी नोकरीसाठी व स्वाभिमानाने पुरुष महिला यांच्या प्रमाणे समतेची वागणूक मिळावी यासाठी धडपड करत आहे. तृतीयपंथी यांच्या बाबतीत समाज उदासीन दिसत असून ही उदासीनता आपल्या शासनामार्फतच कमी होऊ शकते. अनेक तृतीयपंथी आज उच्च शिक्षित आहेत पण स्वाभिमानाच्या आणि हक्काच्या नोकरीपासून वंचित आहेत. अशा तृतीयपंथीयांना विशेष आरक्षित जागा जाहीर करून तृतीयपंथी यांना पोलीस भरतीत सहभागी करून घ्यावे, अशी मागणी रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेने केली आहे.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर आम्ही गांभीर्याने विचार करून तृतीयपंथी बांधवांना पोलीस भरतीत समाविष्ट करून घेण्यासाठी प्रस्ताव ठेवू, असे आश्वासन दिले. यावेळी रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रामा भोरकडे, महासचिव निलेश पवार, सिद्धी कुंभार, निकिता मुख्यदल, रूपा टाकसाळ, प्रेम लोटलीकर उपस्थित होते.