मुंबई: शहरी नक्षलवाद आणि भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना 22 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी आज संपल्यामुळे तेलतुंबडे यांना शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टासमोर सादर करण्यात आले. एनआयए कोर्टाने आनंद तेलतुंबडे यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 वाढ केली आहे. ही चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी पाच जुनला संपणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपताच तेलतुंबडे हे मुंबईतील एनआयए मुख्यालयात तपास यंत्रणेला शरण आले होते. त्यानंतर एनआयएकडून त्यांना अटक करण्यात आली. तर माओवादी तसेच दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून वादाच्या भोवऱ्यात अडकलेले गौतम नवलखा हे दिल्लीत एनआयएला शरण आले असून त्यांना तिथे अटक करण्यात आली आहे.
गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे हे दोघेही एल्गार परिषदेशी संबंधित असून भीमा-कोरेगाव प्रकरणात त्यांच्या सहभागाबाबतही अनेक पुरावे उपलब्ध आहेत. त्याबाबत चौकशी आणि अधिक तपास सुरू असल्याचे एनआयएने न्यायालयात सांगितले आहे.