नवी दिल्ली : करोना बाधितांची संख्या ज्या पध्दतीने वाढत आहे त्याबाबत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने चिंता व्यक्त केली असतानाच काही तज्ज्ञांच्या मते ही साथ सामुहिक संसर्गाच्या पातळीत प्रवेश केल्याचे चिन्ह आहे.
गेल्या आठवड्यात दररोज 650 ते एक हजार बाधित सापडत होते. त्यामूळे देशातील बाधितांची संख्या 10 हजार 752 वर पोहोचली आहे. त्यात 361 मरण पावलेल्यांचाही समावेश आहे. चाचणीचे किट अधिक उपलब्ध करून दिल्यामुळे अधिक प्रमाणात चाचणी होत आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या वेगाने वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
भारतात करोना बाधितांची संख्या घातक पध्दतीने वाढत आहे. मात्र प्रयोगशाळेत येवढ्या वाढत्या संख्येने चाचणी घेणे अवघड होणार आहे, असे आयसीएमआरने म्हटले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मात्र सामुहिक संसर्गाची पातळी गाठली नसल्याचे म्हटले आहे. अशी पातळी गाठली तर त्यात लपवण्यासारखे काही नाही. उलट गाठल्यास ते जाहीर करण्यात येईल. कारण, त्यामुळे नागरिक संसर्ग होऊ नये म्हणून अधिक खबरदारी घेतील, असे केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी म्हटले आहे.