पुणे – दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या शंकाचे पूर्ण निरसन करण्याची तयारी दाखवूनही या संघटनांचे नेते आपला हेका सोडण्यास तयार नाहीत. या नेत्यांना फक्त मोदी सरकारला अडचणीत आणायचे आहे. या आंदोलनाआडून काही शक्ती अराजक माजवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला.
भाजपातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पाटील म्हणाले, “पंजाबात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी अनेक दिवसांपासून केंद्र सरकार चर्चा करत आहे. अचानक या संघटनांनी दिल्लीत येऊन आंदोलनाचा निर्णय जाहीर केला. तेथेही या संघटनांच्या नेत्यांकडे सरकारने अनेकदा चर्चेचे प्रस्ताव पाठवले. शंका दूर व्हाव्यात, यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याचीही तयारी सरकारने दर्शवली आहे. तसे प्रस्तावही या संघटनांच्या नेत्यांकडे पाठवले आहेत.’
किमान आधारभूत किंमतीने (एमएसपी) अन्न-धान्य खरेदी यापुढेही सुरू राहणार आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनेकदा स्पष्ट केले आहे. तसे लेखी आश्वासन देण्याची तयारीही केंद्र सरकारने चर्चेवेळी दाखविली आहे. सध्याची बाजार समित्यांची व्यवस्थाही कायम राहणार आहे. शेतकऱ्यांना बाजार समित्यांबरोबर आपल्या शेतमालाच्या विक्रीचा आणखी एक पर्याय उपलब्ध राहणार आहे.
शेतकरी त्याच्या पसंतीनुसार आपला शेतीमाल कोठेही विकू शकेल. तसेच कॉन्ट्रॅक्ट शेती बाबतचे गैरसमजही केंद्र सरकारने दूर केले आहेत. असे असताना कायदे रद्दच करा या मागणीवर संघटनांचे नेते ठाम आहेत. या नेत्यांना कायद्याला विरोध करून राजकीय हेतू साध्य करायचे आहेत, असे आता दिसू लागले आहे,’ असेही पाटील म्हणाले.