राजस्थानातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतमोजणीचा पूर्ण निकाल हाती यायच्या आधीच भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याची परस्पर घोषणा करणारा भाजप, प्रत्यक्षातील निकालाने मात्र चांगलाच तोंडघशी पडल्याचे उघड झाले आहे. भाजप नेत्यांचा दावा सपशेल खोटा ठरल्याचे उघडकीला आले असून राजस्थानातील विजयी उमेदवारांच्या अधिकृत संख्याबळानुसार भाजप पहिल्या नव्हे तर चक्क तिसऱ्या क्रमाकांवर गेल्याचे उघड झाले आहे.
निकालाची जी अधिकृत आकडेवारी उपलब्ध झाली आहे, त्यानुसार एकूण ज्या 1 हजार 775 वॉर्डांसाठी निवडणुका झाल्या त्यात कॉंग्रेसला 620 जागा मिळाल्या असून कॉंग्रेस पहिल्या क्रमांकावर राहिल्याचे सिद्ध झाले आहे. अपक्षांना दुसरे स्थान मिळाले असून त्यांना तेथे 595 जागा मिळाल्या आहेत. तिसरे स्थान भाजपला मिळाले असून त्यांना 540 जागा मिळाल्या आहेत. पूर्ण निकाल जाहीर व्हायच्या आतच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आम्ही राजस्थानात सर्वाधिक जागा मिळवून पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलो आहोत असे घोषित करणे, त्यामुळे त्यांच्या अंगलट आले आहे. वास्तविक राजस्थानातील त्या स्थानिक स्वरूपाच्या निवडणुका होत्या. त्या निवडणुकीतील यशापयशाविषयी राष्ट्रीय पातळीवरून डंका वाजवण्याची खरे म्हणजे गरजच नव्हती. त्या निकालाला भाजपने राष्ट्रीय पातळीवर महत्त्व दिल्याने त्यांची तेथे नाहक पंचाईत झाली आहे. त्यात कॉंग्रेसचा डंका मात्र जोरात वाजला आहे. भाजपच्या नेत्यांनी मतमोजणी पूर्ण व्हायच्या आत हा गाजावाजा केला नसता, तर कॉंग्रेसच्या या विजयाला कोणी फार महत्त्व दिले नसते.
स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीशी राष्ट्रीय संदर्भ जोडून डांगोरा पिटण्याची उठवळ भाजप नेत्यांची हौसही त्यांच्याच अंगलट आली आहे. निवडणूक प्रचारात आमचाच पक्ष विजयी होईल असा दावा करणे वेगळे आणि प्रत्यक्ष मतमोजणीतही आमचाच पक्ष विजयी झाल्याची चक्क खोटी घोषणा करणे वेगळे. प्रकाश जावडेकर यात आघाडीवर होते. त्यांनी भाजपचा हा विजय म्हणजे ग्रामीण राजस्थानातील नागरिकांनी केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या बाजूने दिलेला कौल आहे, असा दावा केला होता. वास्तविक राजस्थानातील नगरपालिका आणि पंचायत समित्यांच्या या निवडणुकीचा प्रचार राष्ट्रीय मुद्द्यांवर झालाच नव्हता. तीन कृषी विषयक कायद्यांवरही ती निवडणूक लढली गेली नव्हती. पण या विजयाचा अन्वयार्थ नागरिकांनी केंद्राच्या तीन कृषी विधेयकांना दिलेल्या पाठिंब्याशी लावणे हा शुद्ध फाजीलपणा होता आणि त्यात भाजपचीच फसगत झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना वास्तविक आता अशी आगळीक करण्याची गरज नाही.
संपूर्ण देशात भाजपची आता अत्यंत उत्तम स्थिती असताना या पक्षाचे लोक नवख्या राजकारण्यांसारखे का वागतात, याचे आश्चर्य वाटल्या खेरीज राहात नाही. आम आदमी पक्षाचे लोकही असा प्रकार करताना कधी दिसत नाहीत. वास्तविक त्यांचा पक्ष हा राजकारणाचा फार अनुभव नसलेल्या लोकांचा पक्ष आहे. त्यांच्या पक्षात कार्य करणाऱ्या कोणत्याही नेत्याला पूर्वाश्रमीचा राजकीय वारसा नाही किंवा त्यांचा पक्ष गेली बरीच वर्षे राजकारणात कार्यरत आहे असेही नाही, पण तरीही जो संयमीपणा आम आदमी पक्षाच्या लोकांकडून दाखवला जातो, तितकेही व्यवधान भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांना का दाखवता येत नाही, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांच्या दाव्यांत सत्यता किती, हा प्रश्न सातत्याने निर्माण होताना दिसत आहे. सध्या दिल्लीत जे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे त्याबाबतीतही त्यांच्याकडून विविध असत्य दावे सातत्याने केले जात आहेत.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला चीन आणि पाकिस्तानची फूस आहे, असा दावा या सरकारमधील केंद्रीय मंत्र्यांकडूनच जेव्हा केला जातो त्यावेळी त्यांचे हसे झाल्याशिवाय राहात नाही. अर्थात, असा असत्य दावा करण्यामागे त्यांचा राजकीय हेतू स्पष्ट असतो ही बाब वेगळी. हे अजाणतेपणाने नव्हे तर जाणूनबुजून केलेले दावे असतात. कोणतीही महत्त्वाची घटना घडली की, त्याची पूर्ण सत्यता पडताळून प्रतिक्रिया देण्याला राजकारणात महत्त्व असते किंवा तेच शहाणपणाचे ठरते. भाजपच्या उत्साही नेत्यांकडे मात्र तेवढा वेळ नसतो. भाजप नेत्यांचे असे हसे या आधी अनेक वेळा झाले आहे. या संबंधात मध्यंतरी घडलेली एक घटना अनेकांच्या चांगलीच लक्षात राहिली आहे.
सन 2019 च्या निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींनी अचानक प्रसार माध्यमांपुढे येत राष्ट्राला उद्देशून भाषण दिले आणि त्यात त्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. भारताच्या एका वैज्ञानिक संस्थेने हवेतील लक्ष्याला हवेतच मारा करून ते नष्ट करणारे एक क्षेपणास्त्र विकसित केले होते व त्या क्षेपणास्त्राची जी चाचणी घेण्यात आली ती यशस्वी ठरल्याची माहिती देणारी घोषणा पंतप्रधानांनी त्या राष्ट्रीय भाषणात केली होती. त्यावेळी त्यांनी जे शब्दप्रयोग वापरले होते ते असे होते की, भारताने विकसित केलेल्या क्षेपणास्त्राने अंतरिक्षातील “एक उपग्रह को मार गिराया हेै!‘ पंतप्रधानांच्या घोषणेनंतर या विषयाची पूर्ण महिती न घेताच भाजपच्या अनेक नेत्यांनी भारताने चीनचा उपग्रह नष्ट केल्याचा दावा सुरू केला होता.
महाराष्ट्रातील एका भाजप नेत्याने तर भारताने पाकिस्तानचा उपग्रह पाडला असल्याचे जाहीर करून मोदींचा उदोउदो सुरू केला होता. पण त्यांचे हे सारे दावे फोल होते हे नंतर स्पष्ट झाले. वास्तविक अंतरिक्षातील जे लक्ष्य अचूक नेम धरून पाडण्यात आले होते ते आपल्याच वैज्ञानिक संस्थेने आपल्या प्रयोगासाठी हवेत पाठवले होते व क्षेपणास्त्राच्या चाचणीतून त्यावर मारा करून ते पाडण्यात आले होते. ही बाब नंतर लक्षात आल्यानंतर भाजप नेत्यांचे चेहरे मात्र पाहाण्यासारखे झाले होते. क्षेपणास्त्राच्या या अचूक चाचणीच्या यशावर त्यामुळे पाणी पडले होते. उताविळ राजकारणी आपल्याच पक्षाला कसे अडचणीत आणतात याची ही ठळक उदाहरणे आहेत. त्यांच्या बाबतीत वारंवार असे होणे हे त्यांच्यासाठीच हानिकारक आहे. बाकी सोशल मीडियात भाजपच्या आयटीसेलकडून सुरू असलेल्या तद्दन खोट्या दाव्यांबद्दल न बोललेलेच बरे.
भाजप समर्थकांकडूनही मग त्याचेच अनुकरण केले जात असल्याने ती एक वेगळीच समस्या समाज माध्यमांवर उद्भवली आहे. त्याचा एक उलट परिणाम असा झाला आहे की भाजप समर्थकांना प्रत्त्युत्तर देण्यासाठी म्हणून विरोधी पक्षांच्या समर्थकांनीही आता खोट्या प्रचाराचा आश्रय घ्यायला सुरुवात केली आहे. ही खोटेपणाची स्पर्धा नेमकी कोणत्या स्तराला जाणार आहे याचा अंदाजच लागेनासा झाला आहे.