भोपाळ – भोपाळ गॅस दुर्घटनेतील विधवां महिलांना एक हजार रूपयांची जादा पेन्शन देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी आज ही माहिती दिली.
या महिलांना जी सामाजिक सुरक्षा पेन्शन सुरू आहे त्या व्यतिरीक्त त्यांना हीं पेन्शन दिली जाणार आहे. या महिलांना सन 2013 सालीच ही पेन्शन देण्याचा निर्णय झाला होता. पण त्याची अंमलबजावणी झाली नव्हती.
मात्र आता त्यांना ही पेन्शन प्रत्यक्ष अदा केली जाणार आहे. या महिलांच्या एका प्रतिनिधीने सांगितले की आम्हाला डिसेंबर 2019 पासून ही पेन्शन मिळायला हवी. त्यानुसार सरकारने आम्हाला त्याची थकबाकीही दिली पाहिजे.
भोपाळ गॅस दुर्घटनेत पंधरा हजार लोकांचा मृत्यू झाला होता. 1984 साली 2 डिसेंबरला रात्री युनियन कार्बाईड कंपनीच्या कारखान्यातून मिथाईल आयसोसायनेट या विषारी वायुचा प्रादुर्भाव होऊन हे मृत्त्यू तांडव झाले होते.