Amritpal Singh । खलिस्तान दहशतवादी आणि ‘वारीस पंजाब दे’ संघटने चा प्रमुख अमृतपाल सिंगविषयी मोठी बातमी समोर येत आहे. सिंगच्या आईला पंजाब पोलिसांकडून अटक करण्यात आलीय. अमृतपालची आई बलविंदर कौर व्यतिरिक्त त्याचे काका आणि इतर तीन लोकांनाही अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
‘चेतना मार्च’ च्या एक दिवस आधी अटक Amritpal Singh ।
अमृतसरचे डीसीपी आलम विजय सिंह यांनी सांगितले की, अमृतपालची आई बलविंदर कौर यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. अमृतपालच्या आईला ‘चेतना मार्च’ काढण्याच्या एक दिवस आधी अटक करण्यात आली आहे. सध्या अमृतपाल आणि त्याच्या नऊ सहकाऱ्यांना आसाममधील दिब्रुगड तुरुंग ठेवण्यात आले आहे. याठिकाणावरून अमृतपालला पंजाबमधील तुरुंगात हलवण्याच्या मागणीसाठी भटिंडा येथील तख्त दमदमा साहिब येथून ८ एप्रिल रोजी मोर्चा काढण्यात येणार होता.
बलविंदर कौर आणि इतर कैद्यांचे कुटुंबीय 22 फेब्रुवारीपासून अमृतसरमधील सुवर्ण मंदिराजवळ उपोषणाला बसले होते. जोपर्यंत अमृतपाल आणि इतर कैद्यांना पंजाब तुरुंगात हलवले जात नाही तोपर्यंत आपले उपोषण सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचवेळी अमृतपालच्या आईसह अन्य लोकांच्या अटकेवरूनही राजकारण सुरू झाले. अकाली दलाने पंजाबच्या आम आदमी पार्टी सरकारचा निषेध केला आहे. अकाली दलाचे प्रवक्ते परंबंससिंग रोमाना यांनी सांगितले की, अमृतपाल सिंग यांच्या आई आणि मोर्चा काढणाऱ्या इतर लोकांना अटक करण्यात आली आहे, जी निंदनीय आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण? Amritpal Singh ।
गेल्या वर्षी २३ फेब्रुवारीला अमृतपाल आणि त्याच्या वारिस पंजाब दे या संघटनेशी संबंधित लोकांनी अजनाळा पोलिस स्टेशनवर हल्ला केला होता. अमृतपाल आणि त्यांच्या समर्थकांच्या हातात तलवारी, लाठ्या-काठ्या होत्या. तब्बल आठ तास हा गोंधळ सुरू होता. अमृतपालचा समर्थक लवप्रीत तुफानच्या सुटकेच्या मागणीवरून हा गोंधळ झाला.
बरिंदर सिंग नावाच्या व्यक्तीचे अपहरण आणि मारहाण केल्याप्रकरणी लवप्रीत तुफानला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, गोंधळानंतर पोलिसांनी त्याला सोडून दिले. या घटनेबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यानंतर अमृतपालचे अनेक साथीदार पकडले गेले, मात्र तो अनेक दिवस फरार होता.पंजाब पोलिसांनी अमृतपालवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केला होता. या घटनेनंतर सुमारे दोन महिन्यांनी अमृतपालला अटक करण्यात आली.