मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडीनंतर सर्वच पक्ष सध्या ऍक्टिव्ह होताना पाहायला मिळत आहे. त्यातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे विविध ठिकाणी दौरे करताना दिसत आहे. पक्ष मजबूत करण्याच्यादृष्टीने हे दौरे असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता कामाला लागण्याच्या सूचना अमित ठाकरे यांनी मनसैनिकांना केल्या आहेत.
अमित ठाकरे मनसैनिकांना नवचैतन्य देण्यासाठी चांगलेच कामाला लागले आहेत. सर्वसामान्य लोकांशी, तरुणांशी, विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. राज्यात आगामी कालावधीत अनेकविध निवडणुका होऊ घातल्या आहेत.
त्याबाबत बोलताना, येणारी प्रत्येक निवडणूक आपल्यासाठी महत्त्वाची आहे. येत्या निवडणुकीत सक्षम उमेदवार द्यायचा आहे आणि तो निवडून आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करायचे आहेत. त्या निवडणुकांमध्ये प्रचार करण्यासाठी तयार आहे. कुठलीही निवडणूक लागली तरी मला बोलवा. आपण जोरदार प्रचार करू. आपल्याला प्रत्येक निवडणूक लढायची आहे आणि जिंकायचीदेखील आहे. त्यामुळे मनसैनिकांनो, कामाला लागा, अशा सूचना अमित ठाकरे यांनी दिल्या आहेत.
आपल्या पक्षाने केलेले काम आणि विचार घरोघरी पोहोचवू, असे सांगत, आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेत बंड होण्याआधी मी माझे दौरे सुरू केलेत. पण माझा आदित्य ठाकरेंना प्रश्न आहे. जर एकनाथ शिंदे यांचे बंड झाले नसते तर तुम्ही दौरा केला असता का, एवढाच माझा एक प्रश्न आहे, असे अमित ठाकरे म्हणाले. तसेच तेजस ठाकरे ठाकरे राजकारणात सक्रीय होत आहेत, अशा चर्चा आहेत. त्यावर अमित ठाकरेंनी भाष्य केलेय. तेजस राजकारणात येत असतील तर त्यांचे स्वागत आहे, असे अमित ठाकरे यांनी सांगितले.