नवी दिल्ली – देशात सध्या जी कोळसा टंचाई सुरू आहे त्यावर त्वरीत उपाययोजना केली गेली नाही तर ऍल्युमिनीयम उद्योगातील पाच हजार छोटे आणि मध्यम प्रकल्प मोठ्या प्रमाणावर अडचणीत येण्याची शक्यता असून त्यांच्या पुढे मोठे नुकसान होण्याचा धोका उभा ठाकला आहे असे इंडियन इंडस्ट्रीयल व्हॅल्यु चेन कॉन्सिलने म्हटले आहे.
देशात 80 टक्के कोळसा पुरवठा कोल इंडिया कंपनीकडून होतो. सध्या या कंपनीने आपले सारे लक्ष देशातील औष्णिक वीज प्रकल्पांकडे केंद्रीत केले असून त्यांनाच प्राधान्याने कोळसा पुरवला जात आहे. त्यामुळे अन्य उद्योगांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यातून ज्या साखळी उद्योगांवर ऍल्युमिनीयम उद्योग अवलंबून आहे ते उद्योगही कोळसा टंचाईमुळे अडचणीत आले आहेत त्याचा विपरीत परिणाम ऍल्युमिनीयम उद्योगावर होताना दिसत आहे.
या क्षेत्रातील पाच हजार कारखाने सध्या या विचीत्र टंचाईच्या स्थितीत सापडले आहेत असे या कौन्सिलचे राष्ट्रीय निमंत्रक अभय राज मिश्रा यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की या उद्योगाला कोळशाचा पुरवठा थांबवण्यात आला आहे. त्यामुळे ऍल्युमिनीयम उत्पादक संकटात सापडले आहेत.
त्यांचे उद्योग बंद पडले तर त्यावर अवलंबून असलेल्या लक्षावधी लोकांनाही त्याचा मोठा फटका बसणार आहे. सध्या या उद्योगाला कच्चा मालाचाही मोठा तुटवडा पडत आहे. त्यामुळे हा माल आयात करावा लागत आहे. त्यातूनही या उद्योगाला मोठे नुकसान सोसावे लागत आहे असे त्यांनी म्हटले आहे.