काळाने हिरावून
नेला माझा तान्हा…
कायमचा नजरेआड गेला कान्हा…
सांग का सुकला
माझ्या ममतेचा पान्हा..!
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल 485 मातांची गेल्या वर्षभरातील ही अवस्था आहे. नऊ महिने उदरात वाढविलेल्या बाळाच्या भविष्याचे स्वप्न रंगविणाऱ्या या दुर्दैवी मातांना आपल्या काळजाच्या तुकड्याचा पहिला टाहोदेखील ऐकता आला नाही. कारण जगात आल्यावर आपल्या मातेच्या कुशीत येण्यापूर्वीच या निरागस जीवांना मृत्यूने अलगद उचलले. स्मार्ट सिटीपासून ते मेट्रो सिटीकडे वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात बालमृत्यूचा धक्कादायक आकडा समोर आला आहे.
औद्योगिक नगरीत 2021 मध्ये नवजात 485 अर्भकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू होण्यामध्ये मुलांचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत थेट तिप्पटीने वाढले आहे. 284 मुलांचा तर 201 मुलींचा मृत्यू झाला आहे. करोना संकटामुळे गोरगरीब मजुरांचा गेलेला रोजगार, निर्माण झालेली बेकारी, रुग्णालये बंद असल्याने गरोदर माता आणि अर्भकांची उपचाराअभावी झालेली गैरसोय अशा अनेक कारणांमुळे बालमृत्यूचे प्रमाण वाढले आहे. शहरातील बाल मृत्यूचे प्रमाण रोखण्याचे महापालिकेसमोर आव्हान उभे राहिले आहे.
शहरात महापालिकेची 10 रुग्णालये आहेत. त्यामध्ये 700 खाटांच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचा समावेश आहे. याशिवाय आठ प्रसूतिगृहे, 28 दवाखाने, झोपडपट्ट्यांमध्ये 20 आरोग्य केंद्र आहेत. 8 कुटुंब नियोजन केंद्र, 38 लसीकरण केंद्र आहेत. या मार्फत रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवली जाते. माता बालसंगोपन आणि जन्मजात अर्भके, बालकांसाठी विविध सेवा, सुविधा महापालिकेमार्फत पुरविल्या जातात. शहराची लोकसंख्या 25 लाखांच्या आसपास आहे. शहरात 0 ते 6 वयोगटातील बालकांची संख्या सुमारे सव्वा तीन लाख आहे. 2019-20 मध्ये 143 बालकांचा मृत्यू झाला. तर 2020-21 मध्ये तब्बल 485 बालकांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. 0 ते 1 या वयोगटातील 302 अर्भकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 137 मुली, तर 165 मुलांचा समावेश आहे.
काय उपाययोजना करता येतील?
एकात्मिक बालविकास योजना प्रभावीपणे राबविणे, मातांचे कुपोषण रोखणे. झोपडपट्ट्यांमध्ये कुपोषणाला प्रतिबंध करणाऱ्या आरोग्यविषयक योजना राबविणे. साथरोग व इतर संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण व त्यांच्या फैलावास प्रतिबंध करणे. महापालिकेच्या आरोग्यविषयक पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे. राष्ट्रीय आरोग्य उपक्रमांची परिणामकारक अंमलबजावणी करणे. कुटुंब कल्याण कार्यक्रम, माता बालसंगोपन कार्यक्रम राबवणे. प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या वाढवणे.
“या’ कारणामुळे होतोय बालकांचा मृत्यू
नवजात बालकांमध्ये प्रामुख्याने संसर्गजन्य रोग, अपघात, श्वसनमार्गाचे रोग, जन्मजात विसंगती ही कारणे दिसून येतात. त्याचबरोबर न्यूमोनिया, डायरिया या आजारांनीदेखील बालकांचे मृत्यू होतात. काही वेळेला बाळाला वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव गमविण्याची वेळ येते. करोनाच्या प्रादुर्भावाच्या पहिल्या टप्प्यात मोठी खासगी रुग्णालयेही बंद होती. याचा परिणाम गरोदर माता आणि अर्भकांवर झाला. उपचाराअभावी त्यांची मोठी गैरसोय झाल्याने बालकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले.