पिंपरी – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असला तरी निवडणुका पावसाळ्यानंतर होणार की त्यापूर्वी? हा प्रश्न अद्यापही निकाली निघालेला नाही. त्यामुळे तारखांचा गोंधळ निर्माण झाला आहे. यामुळे इच्छुकांची अस्वस्थता वाढली असून राज्य निवडणूक आयोग आता अंतिम निर्णय काय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची 13 मार्च 2022 रोजी मुदत संपुष्टात आली आहे. करोनाची साथ आटोक्यात आल्यामुळे निवडणूक आयोगाने महापालिकेच्या निवडणुकीची तयारीही चालविली होती. मात्र राज्य शासनाने कायदा करून प्रभागरचनेचे अधिकार स्वत:कडे घेतल्यामुळे निवडणूक आयोगाचे काम थांबले होते. याविरोधात दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने 2 आठवड्यात निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. मात्र पावसाळ्यात निवडणुका घेणे अशक्य असल्याचे कारण दिल्याने पुन्हा तारखेचा गोंधळ निर्माण झाला आहे.
सुरुवातीला ओबीसीच्या आरक्षणावरून तर त्यानंतर राज्य शासनाने केलेल्या कायद्यामुळे इच्छुकांनी केलेल्या तयारीवर पाणी फेरले गेले होते. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेला सुरुवात केल्यामुळे इच्छुकांनी जोर धरला होता. त्यातच शिवजयंती, आंबेडकर जयंतीसह राम नवमी व हनुमान जयंतीसारखे उत्सव जोरात साजरे करण्यात आले होते. इच्छुकांनी गाठीभेटी घेण्यासह संपर्क कार्यालये थाटून तयारीही चालविली होती. मात्र राज्य शासनाने कायदा केल्याने अनेक इच्छुकांनी संपर्क कार्यालये बंद करून शांत राहणे पसंद केले होते.
दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर अचानकपणे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येताच बंद झालेली कार्यालये पुन्हा उघडण्यात आली होती. मात्र निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाल्याने अवघ्या दोनच दिवसांत उघडण्यात आलेली काही कार्यालये बंद झाल्याचे पहावयास मिळत आहे. एकुणच निवडणुका कधी होणार याचे निश्चित उत्तर कोणाकडेच नसल्यामुळे इच्छुकांमध्ये मोठी अस्वस्थता पहावयास मिळत आहे.