आळंदी : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला गालबोट लागणारा प्रकार समोर आला आहे. ११ जून रविवारी दुपारी चारच्या सुमारास पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक होऊन झटापट झाली होती. यामध्ये पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. तर दुसरीकडे आता या सर्व प्रकरणातील दुसरी बाजू समोर आली. पोलिसांना रेटून वारकरी पुढे जात असल्याचा एक व्हिडीओ समोर आला. यावरून राजकीय नेत्यांनीही आपलं मत मांडले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाने सरकारवर जोरदार टीका केली होती. मनसेनेही या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
अशात आता प्रकरणावर आळंदी मंदिर प्रशासनाने वृत्त माध्यमांशी बोलतात मौन सोडले आहे. हा प्रकार कसा घडला आणि कसा टाळता आला असता, हे मंदिर प्रशासनाने सांगितले आहे.
वृत्त माध्यमांशी बोलताना मंदिर प्रशासनाने सांगितले की,’जोग वारकरी शिक्षण संस्थेतील ३०० ते ४०० विद्यार्थी पालखी प्रस्थनाला सुरुवात होत असताना मंदिरात प्रवेश घेण्यासाठी आले. या विद्यार्थ्यांनी मंदिरात प्रवेशासाठी पोलिसांशी हुज्जत घातली. त्यातील ३५ जणांना प्रवेश देण्याचे मान्य केले तरी ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी बळजबरीने मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि पुढची कारवाई झाली. विद्यार्थी सामंज्यस्याने वागले असते तर हे घडले नसते असेही मंदिर प्रशासनाने स्पष्ट केल आहे.
तत्पूर्वी, संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराच्या समोर काही तरुण मंदिरात शिरण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना अडवताना पोलिसांनी सौम्य लाठीमार केला होता. मात्र तो लाठीमार झालेला नाही, किरकोळ झटापट झाल्याचा खुलासा पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केला होता. तर विरोधी पक्षांनी या घटनेवरुन राज्य सरकारवर सडकून टीका केली होती. असे असतांना रविवारच्या घटनेचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यामुळे या सर्व वादाला आणखी वेगळे वळण मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.