चंदीगड – भाजपने अकालीदलाला सीएएविषयी भूमिका बदलण्याची सुचना केली आहे. ती त्यांनी मान्य केली नाही म्हणून त्यांनी अकालीदलाशी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत युती केली नाही. त्यामुळे अकालीदलाने दिल्ली विधानसभा निवडणूक न लढवण्याचे ठरवले आहे. त्यावरून पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी अकालीदलाला भाजप प्रणित एनडीएतून बाहेर पडण्याची सुचना केली आहे.
सीएए कायदा पसंत नसेल तर अकालीदलाने भाजपशी आपले संबंध पुर्णपणे तोडून टाकले पाहिजेत असेही अमरिंदरसिंग यांनी म्हटले आहे. भाजपशी सीएए वरून मतभेद झाल्याने दिल्लीची विधानसभेची निवडणूकच न लढवण्याचा अकालीदलाचा निर्णय मान्य होण्यासारखा नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
भाजपशी युती झाली नाही तर दिल्लीत आपण एकही सीट जिंकणार नाही अशी खात्री असल्यामुळेच अकालीदलाने हा निर्णय घेतला असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. आपण सीएए कायद्याच्या विरोधात ठाम भूमिकेत आहोत असे जर अकालीदलाला जनतेला दाखवून द्यायचे असेल तर त्यांनी भाजपप्रणित आघाडीतून बाहेर पडावे अशी सुचनाही त्यांनी केली आहे. अकालीदलाचा केंद्र सरकार मध्ये केवळ एक मंत्री आहे.
सीएएच्या विरोधात त्यांनी या एकमेव मंत्र्याला माघारी बोलावले पाहिजे अशी सुचनाही त्यांनी केली. अकालीदलाचे नेते आता सीएए कायद्याला विरोध करीत असले तरी प्रत्यक्ष या विषयावर संसदेत जेव्हा मतदान झाले त्यावेळी त्यांनी या कायद्याच्या बाजूने मतदान केले होते हेही कॅ अमरिंदरसिंग यांनी निदर्शनाला आणून दिले.