मुंबई : सहा महिन्यांपूर्वी राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार सत्तेत आलं. सत्तेत आल्यानंतर अनेक मोठे निर्णय सरकारकडून घेण्यात आले. मात्र, आज एकनाथ शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला जात आहे. दरम्यान, आजच्या अधिवेशनाच्या दिवशी नागालँडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचा मुद्दा चांगलाच गाजला.
नागालँडच्या परिस्थितीविषयी बोलताना,सत्ताधारी नेते गुलाबराव पाटील यांनी,”या देशात आणि राज्यात बदलाचे वारे वाहायला लागले अशी वक्तव्य टीव्हीत बघत आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादीकडून भाजपाच्या फक्त मुख्यमंत्र्याला पाठिंबा दिला आहे. म्हणजे बदलाचे वारे कसे वाहायला लागले आहेत. नागालँडमध्येही ५० खोके, बिलकुल ओके असं काही झालंय का? एकीकडे इथे जातीयवादी सरकार म्हणून आरोप करायचे आणि दुसरीकडे मांडीला मांडी लावून बसायचं असं चित्र निर्माण झालंय. ५० खोके आणि बिलकुल ओके, नागालँड ओके असं झालंय का? “असा सवाल उपस्थित केला आहे.
तर गुलाबराव पाटलांनी केलेल्या या वक्तव्यावर विरोधीपक्ष नेते अजित पवार चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या मुद्द्यावर बोलताना,”मंत्रीमहोदयांना आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. गुलाबराव पाटलांना आम्ही अनेक वर्षांपासून ओळखतो. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायला हवं असं नाहीये. राज्य सरकार, केंद्र सरकार, सगळ्या संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. चौकशी करा ना. ही कुठली पद्धत काढली? तुमच्या हातात आहे ना? मग करा ना चौकशी. कारण नसताना कुणावरही कसलेही आरोप का करताय? असा प्रतिसवाल त्यांनी उपस्थितकेला.
पुढे बोलताना अजित पवार यांनी सत्ताधारी नेत्यांवर निशाणा साधत,नागालँडमधली परिस्थिती वेगळी आहे. तिथे सर्व पक्ष एकत्र मिळून सरकार स्थापन करतात अशी परंपरा आहे. भारतातला तो भाग भारतातच राहण्यासाठी भारतीय म्हणून निर्णय घेतला आहे. त्याची चर्चा इथे करून गैरसमज पसरवण्याचं काहीच कारण नाही.असे देखील यावेळी त्यांनी म्हटले.