पुणे – सत्ताधारी आमच्याबद्दल चांगले बोलतील ही अपेक्षाच नाही, आमच्याबद्दल टीकात्मक बोलणे हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे, असा खोचक टोला लगावत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
अजित पवार पुढे म्हणाले की, ओबीसी समाजाला योग्य प्रतिनिधीत्व मिळत नव्हते. त्यासाठी महाविकास आघाडीने सत्तेत असताना ओबीसी समाजाला त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. यातून सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय सर्वांसमोर आहे.
त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले, त्यांना सत्तेत येऊन वर्ष व्हायला आले तरी त्यांनी निवडणुका घेतलेल्या नाहीत. तरीदेखील दुसऱ्यांकडे बोटं दाखवली जात आहेत. एक बोट राष्ट्रवादीकडे करताना तीन बोटं त्यांच्याकडे आहेत, या गोष्टीचे तारतम्य त्यांना आहे का, असा सवाल अजित पवार यांनी केला.
तसेच आमची भूमिका स्पष्ट आहे, त्यानुसार आम्ही काम करतो. कोणत्याही निवडणुका नजरेसमोर ठेवून गोष्टी करण्याची आमची भूमिका नाही, असे स्पष्ट प्रतिपादन यावेळी अजित पवार यांनी केले.
काय म्हणाले होते बावनकुळे….
राष्ट्रवादी काँग्रेसला अखेर ओबीसाची आठवण आली. ओबीसी समाजाचा खरा शत्रू राष्ट्रवादीच आहे, ओबीसी मेळावा म्हणजे राष्ट्रवादीची नौटंकी आहे आणि ओबीसी समाजातील लोक राष्ट्रवादीच्या प्रेमात पडणार नाही, अशी टीका महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.