अजित पवारांचे आमदारांना मार्गदर्शन
मुंबई (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी कॉंग्रेसशी बंडखोरी करीत चार दिवसांनंतर स्वगृही परतलेले नेते अजित पवार यांनी “झालं गेलं गंगेला मिळालं, आता नव्या जोमाने कामाला सुरुवात करायची आहे. जो अध्याय होता तो संपलेला आहे… अशा शब्दात आपली भूमिका स्पष्ट केली.
राष्ट्रवादीशी बंडखोरी करीत भाजपाला सत्ता स्थापनेसाठी मदत करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपाचे औटघटकेचे सरकार पडले. त्यानंतर राष्ट्रवादीत परतलेल्या अजित पवारांनी आज विधानसभेत आमदार सदस्यत्वाची शपथ घेतली.
शपथविधी सोहळ्यानंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक आयोजित केली होती. बंडखोरीनंतर स्वगृही परतलेले अजित पवार आज पहिल्यांदाच पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहीले होते. मात्र ते थेट मंचावरच जाऊन बसले. त्यावेळी आमदारांना मार्गदर्शन करताना त्यांनी झालं गेलं गंगेला मिळले असल्याचे सांगत नव्या अध्यायाला सुरुवात करण्याचे आवाहन केले.
मी राष्ट्रवादीतच होतो, कुठेही गेलो नव्हतो. शरद पवार हेच आपले नेते असून पक्षवाढीसाठी मजबूतीने आपल्याला पुढे जायचं आहे, असे ते म्हणाले. यावेळी शरद पवार व अजित पवार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आमदारांनी मांडला होता.
एकच वादा… अजित दादा…
23 नोव्हेंबर रोजी अजित पवार हे बंडखोरी करीत राष्ट्रवादीतून बाहेर पडले होते. त्यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार मुर्दाबादच्या घोषणा दिल्या होत्या. मात्र, आज आमदारांच्या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थनार्थ अजितदादा झिंदाबाद, एकच वादा… अजित दादा…अशा जोरदार घोषणाबाजी देत परिसर दणाणून सोडला.
अजित पवारांच्या पाठिंब्याबात योग्यवेळी बोलणार – फडणवीस
आमदारांच्या शपथविधीसाठी काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. विधानभवनात येताच सरकार स्थापन करण्यासाठी आपण अजित पवार व राष्ट्रवादीशी साथ का घेतली, असा सवाल फडणवीस यांना केला असता ते म्हणाले, चिंता करू नका, त्यांच्या पाठिंब्याबात योग्यवेळी बोलणार असे सांगत त्यांनी अजित पवारांना सूचक इशारा दिला.