नवी दिल्ली- केंद्र सरकारने दहशतवादाच्या विरोधात शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारले असून, संरक्षण दल दहशतवादाविरोधात परिणामकारक पावले उचलीत आहे. गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांचे निर्दाळण करण्यात यश लाभले आहे. ही माहिती गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
17 नोव्हेंबरपर्यंत यंदा 594 दहशतवादी घटना घडल्या, त्यात 79 जवान आणि 37 नागरिक मारले गेले. गेल्यावर्षी 614 घटना घडल्या होत्या. त्यात 91 सैनिक आणि 39 नागरिक मारले गेले होते. गेल्या वर्षी एकूण 328 वेळा सीमापार क्षेत्रातून घुसरखोरीचे प्रयत्न झाले होते.
यंदा 17 नोव्हेंबरपर्यंत 171 प्रयत्न झाले आहेत. गेल्यावर्षी शस्त्रबंदी उल्लंघनाच्या 2140 घटना घडल्या होत्या. त्यात 30 नागरिक आणि 29 सीमा रक्षक जवान ठार झाले होते. यंदा 17 नोव्हेंबर पर्यंत 2753 घटनांमध्ये 15 नागरिक आणि 17 जवान ठार झाले.