पुणे : विधानसभेच्या 288 जागांच्या उपलब्ध झालेल्या निकालानुसार सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या युतीने गुरुवारी महाराष्ट्रात सत्ता टिकवून ठेवण्यात यश मिळवले आहे. मुरबाड मतदारसंघामध्ये भाजपच्या किसन कथोरे यांनी प्रमोद हिंदुराव यांना 1.72 लाख मतांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत कथोरे यांनी 26, 230 मतांच्या फरकाने ही जागा जिंकली होती. मतदान झालेल्या एकूण मतांपैकी हे 11.63 टक्के होते. तेंव्हा भाजपला एकूण 2,25,470 मते मिळाली होती. तर 2009 च्या विधानसभा निवडणुकीत कथोरे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराला 6,542 मतांच्या फरकाने पराभूत केले होते. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाला 1,79, 100 मते मिळाली होती.
राज्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी होण्याचा मान बारामतीतून अजित पवार यांनी पुन्हा पटकावला. त्यांच्या पाठोपाठ सर्वाधिक मताधिक्य पलूस कडेगाव मतदार संघातून विश्वजित कदम यांनी मिळवले. अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील यांनीही लाखाच्या जवळपास जाणारे मताधिक्य मिळवले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदार संघातून 49 हजार 422 मतांनी विजयी झाले. त्यांच्या विरोधात कॉंग्रेसच्या आशिष देशमुखांनी लढत दिली.
बारामती मतदार संघात अजित पवार यांना अडकवून ठेवण्याची व्युहरचना भाजपाने आखली होती. दिग्गज नेत्यांची यंत्रणा बारामतीसाठी कार्यरत झाली होती. बारामतीत आमचा उमेदवार निवडून आणू, अशी गर्जना मुख्यमंत्र्यांनी केली होती. अजित पवार यांनी मात्र आपण दीड लाखाच्या मताधिक्याने विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला होता.
बारामतीतून अजित पवार यांना 1 लाख 93 हजार 505 मते मिळाली. तर भारतीय जनता पक्षाचे त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी गोपीचंद पडळकर यांना अवघी 30 हजार 76 मते मिळाली. त्यांच्यासह सर्व विरोधी उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या. 1लाख 63 हजार मतांनी पवार विजयी झाले.
पलूस कडेगाव मतदार संघात कॉंग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांना तब्बल 1 लाख 71 हजार 497 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे संजय विभुते यांना अवघी 8 हजार 907 मते मिळाली. येथे नोटाचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. तब्बल 20 हजार 572 जणांनी नोटाचा वापर केला.
कॉंग्रेसच्या अशोक चव्हाण यांना 1 लाख 39 हजार 737 मते मिळाली. तर भाजपाच्या बापुसाहेब गोर्ठेकरांना 42 हजार 881 मते मिळाली. आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील यांना 1 लाख 26 हजार 120 मते मिळाली तर शिवसेनेच्या राजाराम बाणखेले यांना 59 हजार 345 मते मिळाली. 76 हजार 775 माधिक्याने दिलीप वळसे विजयी झाले. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात 1लाख 24 हजर मते मिळवून विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी साहेबराव नवले यांना 62 हजार 870 मते मिळाली. राधाकृष्ण विखे यांना 1 लाख 32 हजार 316 मते मिळाली. तर कॉंग्रेसच्या सुरेश थोरात यांना 45 हजार 292 मते मिळाली.