पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – काही माणसे कर्माने आणि कृतीने अडचणीत येतात. त्यातील एक नाव म्हणजे अजित पवार आहेत. ते साहेबांसोबत होते. तेव्हा सगळे त्यांची वाट पाहत असत. त्यांना दादा म्हणत असत. मात्र आता त्यांना इतरांची वाट पाहत बसावे लागते. ताटकळावे लागते. त्यामुळे आधी ते आमच्याकडे दादा होते. मात्र, आता ते इतरांसोबत गेल्याने त्यांना स्वत:ला “दा’ म्हणायचीही भीती वाटते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर टीका केली.
आव्हाड यांनी सोमवारी पुण्यात मोदीबागेत शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीवरही जोरदार टीका केली. आव्हाड म्हणाले, आमच्याकडे असताना अजित पवारांना कोणताही निर्णय पाच मिनिटांत घेता येत होता. मात्र, काही लोकांना समोर पंचपक्वान्न नको होते.
त्यांना पत्रावळातीच जेवयाचे असेल, तर काय करणार? त्यामुळे जेव्हा भविष्यात राजकीय इतिहास लिहिला जाईल. त्यात अजित पवारांचा उल्लेख नक्की केला जाईल. तसेच आता पंतप्रधानांच्या बाजूनेच बोलत आहेत. तेच दादा वर्षभरापूर्वी त्यांच्याबाबत काय बोलायचे ते पाहिल्यास दादांना एक नाही, तर दहा तोंडे असल्याचे दिसते, अशी टीकाही आव्हाड यांनी केली.
वंचितचा फायदा दुसरा कोणाला ?
वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना देण्यात आलेली उमेदवारी म्हणजे रवींद्र धंगेकरांची मते कमी करून मुरलीधर मोहोळांची मते वाढविण्याचा प्रकार आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी कोणाची बी टीम आहे, हे मोरेंच्या उमेदवारीवरून स्पष्ट होत असल्याची टीकाही आव्हाड यांनी केली.