मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला शनिवारी ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. केतकी चितळे प्रकरणाने राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते. आता याच मुद्द्यावरून आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे.
अजित पवार सांगलीत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना केतकी चितळे विषयी भाष्य केले. यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थी राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुहास कदम यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना, शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात बोलणाऱ्यांना शोधा आणि फोडून काढा, असे आवाहन केले आहे. याचसंदर्भात अजित पवारांना विचारण्यात आले असता त्यांनी संतापलेल्या स्वरामध्ये सविस्तर प्रतिक्रिया नोंदवली.
“हे योग्य वाटतं नाही. हा काही पक्षाने काढलेला फतवा नाहीय”, असं अजित पवारांनी पत्रकारांना सुहास कदम यांच्या वक्तव्यावरुन प्रश्न विचारण्यात आले असता सांगितले. “काही व्यक्ती विकृतीमधून काही बोलत असतील तर विनाश काले विपरित बुद्धी, असे एका वाक्यात सांगता येईल. पण बोलणाऱ्यांनी आपल्याला संविधानाने, कायद्याने, घटनेनं अधिकार दिलेला आहे. परंतू तो अधिकार देत असताना आपण काय वक्तव्य करावं आणि त्या वक्तव्याचा समाजामध्ये वातावरण खराब होणार नाही (याची काळजी घेतली पाहिजे),” असे अजित पवार म्हणाले.
पुढे बोलताना, “प्रत्येक व्यक्ती कुणाला ना कुणाला मानणारी असते, कुणाला ना कुणाला आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवणारी असते. पवारसाहेबांची राजकीय कारकिर्द आपल्याला माहितीय. ६० वर्षांची त्यांची राजकीय कारकिर्द आहे. ६० वर्षांच्या या राजकीय कारकिर्दीमध्ये चांगला विचार मांडण्याचं काम करायचं. चार चार वेळा मुख्यमंत्री व्हायचं, दहा दहा वर्ष देशाचे कृषीमंत्री म्हणून काम करायचं,” असे म्हणत पवारांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा अजित पवारांनी घेतला.
“बोलत असताना नेहमी तुम्ही पाहिलंय की कमरेखालचे वार शरद पवार कधीच करत नाहीत. त्यांच्या काळातही खूप आरोप प्रत्यारोप व्हायचे. तुम्हाला आठवत असेल तो मुंढे साहेबांचा काळ, गोरा खैरनारांचा काळ. मी सगळी नावं घेत बसत नाही. पण त्या काळातही यशवंतराव चव्हाणांच्या पठडीमध्ये तयार झालेले असल्याने पवारांनी कधीही स्वत:चा तोल जाऊ दिलेला नाही. अशा व्यक्तीबद्दल कुणीतरी विकृत व्यक्ती इतक्या घाणेरड्या पद्धतीचं वक्तव्य करते, हे दुर्देव आहे महाराष्ट्राचं,” असे अजित पवार म्हणाले.